Kiran Mane: ‘माझ्या डोळ्यांदेखत विलास पाटीलचा खून केला...’; किरण मानेने व्यक्त केली मनातील खदखद!
Raavrambha Movie Kiran Mane: नुकताच किरण मानेंचा ‘रावरंभा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Raavrambha Movie Kiran Mane: ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता किरण माने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहे. किरण माने नेहमीच सोशल मीडियावर ज्वलंत शब्दांत आपल्या प्रतिक्रिया देत असतात. नुकताच किरण मानेंचा ‘रावरंभा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात त्यांनी छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचं प्रेक्षक कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान प्रेक्षकांचं प्रेम पाहून आता किरण माने यांनी देखील एक पोस्ट लिहिली आहे.
अभिनेते किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, ‘त्यावेळी ही छोटी पण महत्त्वपूर्ण भुमिका माझ्यासाठी लाखमोलाचा आनंद देणारी ठरली होती. वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी माझ्या डोळ्यादेखत माझ्या 'विलास पाटील'सारख्या दिलदार, दिलखुलास, रांगड्या व्यक्तीरेखेचा खून केला होता... मी सैरभैर झालो होतो. अन्यायाविरोधात पेटुन उठलो होतो. त्याचवेळी कुठूनतरी एखादा फ़रिश्ता यावा तसा हा 'हकीमचाचा' अलगद माझ्याजवळ आला. म्हणाला, "चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया..." चार दिवस हकीमचाचा माझ्या शरीरात वास्तव्याला होता... त्यानं नकळत कसली दवा दिली ख़ुदा जाने... माझा मेंदू, माझं मन एकदम शांत झालं.’
पुढे ते लिहितात, ‘रावरंभा सिनेमात रावजी नांवाच्या अनोळखी मावळ्याची 'अनसुनी दास्तान' सांगितलीय... याच मावळ्याला एका बिकट वळणावर हा हकीमचाचा भेटतो.. छत्रपती शिवरायांचा गुप्तहेर, बहिर्जी नाईकांचा चेला... तेज़-नज़र, जिगरबाज वृत्ती असलेला हकीमचाचा जणू काही रावजीलाही म्हणतो, "चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया."...आणि रावजीला त्याची जान 'रंभा' परत मिळवून देतो! गेस्ट अपिअरन्स असूनही ही भूमिका कायम माझ्या काळजाच्या जवळ राहील. ज्या काळात मी या सिनेमाचं शूटिंग करत होतो, त्याकाळात मी आयुष्यातली एक मोठ्ठी लढाई लढत होतो. त्यावेळी त्या लढाईसाठी वेगळंच बळ या चाचानं दिलं मला.’ त्यांनी प्रेक्षकांना ‘रावरंभा’ हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन देखील केले आहे.
विभाग