Shoaib Akhtar : ‘शंभर शतकं करशील पण तुझी हाडं मोडून...’, शोएब अख्तरचं विराट कोहलीला चॅलेंज
shoaib akhtar on virat kohli : आशिया कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध १२२ धावा केल्यानंतर आता विराट कोहलीचा १०१९ दिवसांच्या शतकांचा दुष्काळ संपला आहे.
shoaib akhtar on virat kohli : आशिया कप स्पर्धेतील शेवटच्या T20 सामन्यात भारताचा रनमशिन विराट कोहलीनं धडाकेबाज शतकी खेळी करत त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला आहे. गेल्या १०१९ दिवसांपासून कोहलीला कोणत्याही सामन्यात शंभर धावा करता आलेल्या नव्हत्या. आता तो फॉर्ममध्ये परतल्यानं त्याचे चाहते खुश झाले आहेत. परंतु आता त्याच्या शतकानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं कोहलीची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसोबत तुलना करताना त्याला एक वेगळंच आव्हान दिलं आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तर त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना म्हणाला की, विराट कोहलीनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ शतकं केलेली आहेत. परंतु त्याला शतकांची शंभरी गाठताना फार कष्ट करावे लागणार आहेत. कोहलीनं शंभर शतकं करायला हवीत, अजून २९ शतकं केल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप राहणार नाही. परंतु तोपर्यंत त्याची हाडं मोडून जातील. त्यानं शतकांची शंभरी गाठल्यानंतर तो ग्रेट्सट ऐव्हर म्हणून ओळखला जाईल, असं म्हणत शोएबनं कोहलीला एकप्रकारे शतकांची शंभरी करण्याचं आव्हान दिलं आहे.
कोहली नेहमी सत्य बोलतो...
कोहलीनं नेहमी खरं बोलत असतो, त्यामुळं त्याच्यासोबत कधीही वाईट घडणार नाही. उरलेली २९ शतकं करताना त्याला फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कोहलीनं हिम्मत हारू नये, तेव्हाच तो जगाचा महान फलंदाज म्हणून ओळखला जाईल. असं म्हणत त्यानं कोहलीचं कौतुक करत त्याला शतकांची शंभरी गाठण्यासाठी चॅलेंज केलं आहे.
भारताकडून आतापर्यंत सचिन तेंडूलकरनं शतकांची शंभरी गाठलेली आहे. हा विक्रम तेंडूलकरशिवाय कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. गेल्या १०१९ दिवसांपासून कोहलीच्या बॅटमधून धावा निघत नसल्यामुळं त्याच्यावर अनेकांनी टीका केल्या होत्या. परंतु आता तो फॉर्मात परतल्यामुळं त्याचं कौतुक केलं जात आहे.