भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपल्यानंतर आजपासून म्हणजेच (१७ मार्च) ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू झाली. यातील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी सुपरस्टार रजनीकांत उर्फ थलैवा देखील पोहोचला आहे.
सामन्यात भारताची अवस्था एकवेळ ५ बाद ८३ अशी होती. मात्र, यानंतर रजनीकांत एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबत सामना पाहायला मैदानावर आला. यानंतर भारताची गळती थांबली आहे. सध्या केएल राहुल आणि जडेजा यांच्यात चांगली भागीदारी झाली आहे.
दरम्यान, रजनीकांत हा क्रिकेटचा मोठा चाहता म्हणून ओळखला जातो. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून रजनीकांतचा एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये तो एमसीए अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबत सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पंड्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ही जबाबदारी पार पाडत आहे. मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या ३५.४ षटकांत १८८ धावांत गुंडाळला.
भारताकडून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने ३-३ विकेट घेतल्या, तर रवींद्र जडेजाने २, कर्णधार हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवने १-१ विकेट घेतली. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ८१ धावांची खेळी केली.
८३ धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली नाही, ज्यामध्ये टीमने ५5 धावांवर पहिला विकेट गमावला, तर १६ धावांवर विराटच्या रूपाने संघाला दुसरा मोठा धक्का बसला. यानंतर पुढच्याच चेंडूवर सूर्यकुमार यादव शुन्यावर बाद झाला. शुभमन गिल आणि लोकेश राहुल यांच्यात छोटीशी भागीदारी नक्कीच पाहायला मिळाली पण गिल २० धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. ८३ धावांवर भारतीय संघाने ५ विकेट गमावल्या होत्या, ज्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या २५ धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला होता. हे वृत्त लिहिपर्यंत भारताच्या ३० षटकांत ५ बाद १२३ धावा झाल्या आहेत आणि संघाला विजयासाठी ६६ धावांची आवश्यकता आहे.
संबंधित बातम्या