Jasprit Bumrah: संघात येताच बुमराहला चाहत्यांचा टोमणा; म्हणाले, आरामात IPL मध्येच यायला हवं होतं...
Jasprit Bumrah trolled: भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. मात्र, वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी उपलब्ध नसलेल्या बुमराहला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) श्रीलंकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी बुमराहचा संघात समावेश केला आहे.
भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. आजपासून टी-20 मालिका सुरु होत आहे. तर १० जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.
बुमराह श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत दिसणार आहे. मात्र, त्यापूर्वी तो भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. कारण बुमराह आशिया कप आणि टी-20 वर्ल्डकप २०२२ यांसारख्या महत्वाच्या स्पर्धांना मुकला होता. त्याला दुखापतीमुळे या स्पर्घांमध्ये भाग घेता आला नव्हता. यानंतर आता चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे. बुमराहला ट्रोल करताना एका ट्वीटर युझरने म्हटले की. “एवढी काय घाई होती, आरामात IPL खेळायला यायचे ना!”.
बुमराह सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर
२९ वर्षीय जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे सप्टेंबर २०२२ पासून क्रिकेटपासून दूर होता. टी-२० विश्वचषकही तो खेळला नव्हता. तेव्हापासून तो रिहॅबसाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (NCA) होता. पण आता एनसीएने त्याला फिट घोषित केले आहे. आता तो एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात सामील होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाली होती दुखापत
जसप्रीत बुमराहने २५ सप्टेंबर २०२२ रोजी हैदराबाद येथे आपला शेवटचा टी-20 सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्या सामन्यात बुमराहने ५० धावा लुटल्या होत्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्यानंतर बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडला. त्यानंतर त्याची टी-२० विश्वचषकासाठी संघात निवड झाली होती. पण शेवटच्या क्षणी त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली, त्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली. यानंतर त्याने आता पुनरागमन केले आहे.
भारत-श्रीलंका वनडे मालिका
पहिला वनडे- १० जानेवारी (गुवाहटी)
दुसरा वनडे- १२ जानेवारी (कोलकाता)
तिसरा वनडे- १५ जानेवारी (तिरुअनंतपुरम)