INDvsENG: रोहित शर्मा कसोटी सामना खेळणार नाही? ओपनर मयंक अग्रवालचा संघात समावेश
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी (england vs india) सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (rohit sharma) कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत त्याचा पर्याय म्हणून मयंक अग्रवालला (mayank agarwal) इंग्लंडमध्ये बोलवण्यात आले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या (india vs england) कसोटी सामन्यासाठी मयंक अग्रवालला (mayank agarwal )इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले आहे. अग्रवाल शुभमन गिलसोबत टीम इंडियासाठी डावाची सुरुवात करू शकतो. भारताचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत रोहितचा पर्याय म्हणून मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले आहे.
विमानात बसल्यानंतर मयंकने त्याचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बर्मिंगहॅमला जात असल्याचे लिहिले आहे. भारताचे दोन महत्त्वाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या सामन्यासाठी उपलब्ध नाहीत. अशा स्थितीत गिल आणि अग्रवाल ही जोडी डावाची सुरुवात करू शकते. मात्र, रोहित कसोटी सामन्यापूर्वी तंदुरुस्त होईल की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी १ जुलैपासून होणार आहे. अशा परिस्थितीत रोहितकडे अजून तीन दिवसांचा अवधी आहे. जर रोहित शर्मा बरा झाला तर तो भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवेल आणि गिलसोबत डावाची सुरुवातही करेल. जर तो सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही तर रिषभ पंत किंवा विराट कोहली यांना कर्णधार बनवले जाऊ शकते.
मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार नाही. तो थेट टीम इंडियात सामील होईल आणि सरावाला सुरुवात करेल. मयंकने टीम इंडियासाठी यापूर्वी अनेकदा कसोटीत डावाची सुरुवात केली आहे, यादरम्यान त्याचा रेकॉर्डही चांगला आहे. पण आयपीएल २०२२ मध्ये तो चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळेच त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता.
टीम इंडियाचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह-
भारताचा इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वीच तीन भारतीय खेळाडूंना संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम रविचंद्रन अश्विनला भारतात संसर्ग झाल्याचे आढळून आले होते, त्यामुळे तो संघातील सदस्यांसह इंग्लंडला जावू शकला नाही. अश्विन शेवटी संघात सामील झाला. यानंतर विराट कोहलीलाही कोरोनाचा संसर्ग झाला, मात्र तो वेळेत बरा झाला आहे. आता रोहित शर्मालाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनामुळेच सामना पुढे ढकलण्यात आला होता-
१ जुलैपासून होणारा कसोटी सामना हा यापूर्वी २०२१ मध्ये होणार होता, परंतु त्यावेळी इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यानंतर हा सामना पुढे ढकलण्यात आला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. जर इतर खेळाडूंना कोरोनाची लागण झाली तर या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागू शकतो.