Asia Cup Final: स्टेडियमबाहेर भारतीयांना धक्काबुक्की, टीम इंडियाची जर्सी घातलेल्यांना नो एन्ट्री!
Pakistan Vs Sri Lanka Asia Cup 2022 Final: भारतीय क्रिकेट संघाचा फॅन ग्रुप 'द भारत आर्मी'ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय चाहत्यांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला हे दाखवण्यात आले आहे. चाहत्यांच्या मते, भारतीय जर्सी परिधान करणाऱ्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नव्हता.
दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज आशिया कप T20 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जात आहे. पाच वेळचा चॅम्पियन श्रीलंका आणि दोन वेळचा चॅम्पियन पाकिस्तान हे जेतेपदाच्या लढतीत आमनेसामने आहेत. जेतेपदाचा सामना पाहण्यासाठी पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये आले आहेत. अंतिम सामना पाहण्यासाठी भारतीय चाहतेही स्टेडियमच्या दिशेने येत होते, मात्र त्यांनी टीम इंडियाची जर्सी घातल्याने त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा फॅन ग्रुप 'द भारत आर्मी'ने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये भारतीय चाहत्यांना कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला हे दाखवण्यात आले आहे. चाहत्यांच्या मते, भारतीय जर्सी परिधान केलेल्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नव्हता.
भारतीय संघाची जर्सी घातलेल्या चाहत्याला धक्काबुक्की
भारत आर्मीशी बोलताना एका चाहत्याने सांगितले की, “टीम इंडियाची जर्सी घातल्यामुळे पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली. स्टेडियममध्ये जाण्यासाठी चाहत्याला पाकिस्तानची किंवा श्रीलंकेची जर्सी घालावी लागेल असे सांगण्यात आले”.
'भारत आर्मीने' ही पोस्ट आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषद (ACC) यांना टॅग केली आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
भारत आर्मीची ट्वीटर पोस्ट
भारत आर्मीने ट्विटरवर लिहिले आहे की, “आम्ही आयसीसी आणि एसीसीला या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करत आहोत. कारण आमचे चाहते भारतातून आशिया चषक २०२२ पाहण्यासाठी आले आहेत. मात्र, स्थानिक पोलीस आणि प्रशासन त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देत नाहीए. हे अत्यंत धक्कादायक वर्तन आहे."
आशिया चषक जिंकण्यासाठी पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य
दरम्यान, फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानसमोर १७१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने तुफानी खेळी खेळली. त्याने ४५ चेंडूत ७१ धावा केल्या. राजपक्षेने ३५ चेंडूत टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ठोकले. त्याने चमिका करुणारत्नेसोबत सातव्या विकेटसाठी ३१ चेंडूत ५४ धावांची नाबाद भागीदारी केली. राजपक्षेने ७१ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट १५७.७८ होता. पाकिस्तानकडून हरिस रौफने सर्वाधिक ३ बळी घेतले.
संबंधित बातम्या