Chinese Smartphones : १२ हजारपेक्षा कमी किमतीच्या चिनी फोनवर बंदीची मागणी; सरकार म्हणते…
Ban Chinese Smartphones: १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चीनी स्मार्टफोन्सवर भारतात बंदी घातली जाऊ शकते. मात्र आता भारत सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केलीय.
भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोबाईल बाजारपेठ आहे. भारताच्या मोबाईल मार्केटमध्ये चिनी कंपन्यांचे वर्चस्व आहे, त्यामुळे देशांतर्गत मोबाईल कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. अलीकडेच ब्लूमबर्गच्या एका अहवालात म्हटले आहे की १२ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या चीनी स्मार्टफोन्सवर भारतात बंदी घातली जाऊ शकते. मात्र आता भारत सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, स्मार्टफोन मार्केटमधून चीनी कंपन्यांना बंदी घालण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे म्हटले आहे.
भारतात १२ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या चायनीज स्मार्टफोन्सवर बंदी घालण्यासंबंधीच्या अहवालावर या प्रकरणाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, असा कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे विचारासाठी आलेला नाही.
काउंटरपॉईंट रिसर्चच्या आकडेवारीनुसार, Xiaomi, Realme, Oppo आणि Vivo सारख्या चिनी कंपन्यांनी जून तिमाहीत भारतीय स्मार्टफोन मार्केटचा ६३ टक्के भाग काबीज केला. बहुतेक चिनी कंपन्या त्यांचे फोन भारतातच बनवतात.
लाइव्ह मिंटला उद्योग सूत्रांनी सांगितले की, भारतीय बाजारपेठेतील लावा, मायक्रोमॅक्स, कार्बन आणि इंटेक्स सारख्या कंपन्यांच्या घटत्या शेअरची माहिती सरकारला दिली आहे. लावा आणि मायक्रोमॅक्स सारख्या देशांतर्गत कंपन्यांचा भारतातील स्मार्टफोन विक्रीचा वाटा निम्म्याहून कमी आहे.
तथापि, यापैकी बर्याच कंपन्यांकडे मॅन्युफॅक्चरिंग स्किल किंवा मार्केटिंग तंत्र नाही त्यामुळे या कंपन्या चिनी कंपन्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत.
संबंधित बातम्या