मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Water Cut : ठाणे जिल्ह्यातीलअनेक शहरांमध्ये ‘पाणीबाणी’, MIDC कडून शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Thane Water Cut : ठाणे जिल्ह्यातीलअनेक शहरांमध्ये ‘पाणीबाणी’, MIDC कडून शुक्रवारी पाणी पुरवठा राहणार बंद

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 31, 2023 11:31 PM IST

Thane Water supply :एमआयडीसीकडून ठाणे शहर तसेच मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Thane Water supply
Thane Water supply

Thane Water Cut : ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाणी साठ्याचे नियोजन करण्यासाठी तसेच दुरुस्ती कामासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) शुक्रवारी (२ जून) पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे ठाणे,मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहतींना होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावालागू शकतो.

ठाणे शहर, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात तसेच बदलापूर,अंबरनाथ, डोंबिवली आणि ठाणे टिसीसी अशा औद्योगिक वसाहतींनाही बारवी धरणातूनपाणी पुरवठा करण्यात येतो. एमआयडीसीमार्फत हा पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील पाणी साठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी एमआयडीसीकडून नियोजन करण्यात येते. त्यानुसार जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात लागू करण्यात आली आहे.

एमआयडीसीकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. यामुळे कळवा, वागळे इस्टेटमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर, घोडबंदरमधील कोलशेत खालचा गाव आणि दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) भागातील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे,असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.

 

पालिकांबरोबरच एमआयडीसीनेही धरण क्षेत्रातील पाणी साठ्याचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार १५ ऑगस्टपर्यंत पाणी साठा पुरविण्यासाठी जून महिन्यापासून दर शुक्रवारी शहरांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच एमआयडीसीकडून दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शुक्रवार,२ जून पासून केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरांना एमआयडीसीकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार,२ जून रोजी दुपारी १२ ते शनिवार,३ जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग