Jitendra Awhad Tweet Controversy : गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं वादात सापडलेले जितेंद्र आव्हाड आता पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळं अडचणीत आले आहेत. रावण आणि श्रीराम यांच्याबाबत केलेल्या ट्वीटनंतर आता भाजपनं आव्हाड यांच्याविरोधात राज्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरू केलं असून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपसह शिंदे गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळं आता विधानपरिषदेचा निकाल आणि पुण्यातील पोटनिवडणुकीवरून वादंग पेटलेलं असतानाच आता आव्हाडांच्या नव्या ट्वीटमुळं राष्ट्रवादीची अडचण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत म्हटलं आहे की, रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. बाजूला काढून आदिल शाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं ट्वीट करत आव्हाडांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असं हॅशटॅगही दिलं आहे. आव्हाडांच्या याच ट्वीटवर भाजपसह शिंदे गटाच्या नेत्यांनी आक्षेप घेत त्यांच्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुत्वाला डिचवण्याचा प्रयत्न केला आहे. आव्हाडांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, कारण आता मुंब्रा आणि कळव्यातील अनेक नगरसेवक त्यांना सोडून जात आहेत. त्यामुळं आता आव्हाडांनी केलेल्या ट्वीटवर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्वीटनंतर जालन्यात भाजपनं रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांची जीभ छाटणाऱ्यास १० लाख रुपयांचं बक्षीस देणार असल्याची घोषणा जालन्याचे भाजप ओबीसी मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळत राष्ट्रवादीविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या