Airforce: भारतीय लढाऊ विमानांसाठी आता स्वदेश टायर आणि बॅटरी; ६०० कोटींची होणार बचत
Indian Airforce news भारतीय वायूसेना आता आत्मनिर्भतेकडे वाटचाल करत आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर करून दरवर्षी ६०० कोटी रुपयांची बचत केली जात असल्याची माहिती एअर मार्शल विभास पांडे यांनी दिली.
पुणे : भारतील लढाऊ विमानांसाठी लागणारे टायर आणि बॅटरी हे देशातच उत्पादित केलेले वापरले जाणार आहे. आत्मनिर्भर योजने अंतर्गत हवाई दलाचा स्वदेशीकरणावर भर असून या माध्यमातून जवळपास ६०० कोटी रुपयांची बचत केली जाणार आहे, अशी माहिती हवाईदलाच्या देखरेख विभागाचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी दिली.
पुण्यातील हवाई दालाच्या बेस रिपेअर डेपोत हवाईदलातर्फे स्वदेशीकरणाबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हवाईदलाच्या देखरेख विभागाचे प्रमुख एअर मार्शल विभास पांडे यांनी हवाईदलाच्या स्वदेशीकरणाबाबत विविध पैलूंवर माहिती दिली. संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या (डीआरडीओ) विविध प्रयोगशाळांचे शास्त्रज्ञ तसेच हवाई दलाच्या विविध विभागांचे अधिकारी आणि हवाई दलाशी संबंधित खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
पांडे म्हणाले, देशाच्या आत्मनिर्भरतेच्या धोरणावर आधारित भारतीय हवाईदलाचे संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कृतीआराखडा तयार करण्यात येणार असून हाच या चर्चासत्राचा उद्देश आहे. जगात भारतीय हवाईदलाचा ताकद आणि क्षमतांच्या बाबतीत चौथा क्रमांक लागतो. त्यांच्या देखभालीसाठी मूळ उपकरण उत्पादकांवरील परदेशी अवलंबित्व कमी करण्यासाठी स्वदेशी पर्याय उभे करण्याची गरज आहे असे पांडे म्हणाले.
डीआरडीओ प्रयोगशाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग आणि हवाईदलाच्या क्षमता आणि कौशल्ये यांची महत्वाची भूमिका आहे, असेही पांडे म्हणाले. स्वदेशीकरण करणे या प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज येत्या काळात आहे, असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.
विभाग