Maharashtra Politics : युतीवरून मतभेद.. भाजपाशी युती नको, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान
माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही,तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या-त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर विचार करण्यात यावा. असे अब्दुल सत्तार म्हणाले.
मुंबई – माझ्या मतदारसंघात भाजपशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही,तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या-त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर विचार करण्यात यावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत येऊ, असं विधान शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूड पाडून ४० आमदार आपल्या बाजुने वळवले व महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. त्यानंतर आगामी सर्व निवडणुका शिंदे गट आणि भाजप युती करून लढेल असे दोन्ही पक्षातील नेत्यांनी सांगितले. त्यातच शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको, असं विधान केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
अब्दुल सत्तार म्हणाले,की दिल्लीत आणि मुंबईतसह जिल्ह्यात,महापालिकेत,जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.
निवडणुकीतील चिन्ह आणि आपल्या मतदारसंघातील आपली ताकद यावर अब्दुल सत्तार म्हणाले, मी एकनाथ शिंदेंना सांगितलं की मला कुत्रं निशाणी दिली तरी मी निवडून येईन. कमकुवत माणसाला काहीतरी आधार लागतो. मी कार्यकर्ता आहे आणि जो कार्यकर्ता असतो त्याला कधीही कोणत्याही गोष्टीची भीतीच वाटत नाही.
संबंधित बातम्या