CM Eknath Shinde : अनेकांना समृद्धी मार्ग होऊ द्यायचा नसल्याने जाणीवपूर्वक अडथळे आणले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
CM Eknath Shinde on inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मोदी यांनी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्याचे लोकार्पण केले. यावेळी हा महामार्ग विकासाचा मार्ग ठरेन अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नागपूर : राज्याचा विकासासाठी महत्वाचा असणार समृद्धी महामार्ग तयार करण्यासाठी अनेकांनी जाणीवपूर्वक अडथळे आणले. त्यांना हा महामार्ग पूर्ण होऊ द्यायचा नव्हता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या सर्व अडथळे पार करून हा मार्ग पूर्ण झाला आहे. पर्यावरण पूरक असलेला हा मार्ग देशातील सर्वात मोठा मार्ग असून हा मार्ग विकासाचे मॉडेल ठरणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद मोदी हे आज नागपूर दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते आज विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांचे स्वागत करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक असलेली पगडी घालून आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा मार्ग बांधताना जमिनीचे अधिग्रहण हा महत्वाचा मुद्दा होता. हा मार्ग अनेकांना पूर्ण होऊ द्यायचा नव्हता. हा मार्ग बांधतांना अनेक अडचणी या जाणीवपूर्वक आणल्या गेल्या. मात्र, आम्ही या अडचणी दूर केल्या. या मार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना खात्यात आरटीजीएस द्वारे थेट पैसे जमा केले. केंद्राने देखील हा मार्ग बांधण्यासाठी मोठे सहकार्य केल्याने आज हा मार्ग पूर्ण झाला आहे. समृद्धी मार्ग हा देशतीलस सर्वात लांब असलेला मोठा मार्ग असून हा मार्ग प्रगतीचा आणि विकासाचे मॉडेल ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.
शिंदे म्हणाले, पर्यावरण पूरक असलेल्या या मार्गाच्या दुतर्फा तब्बल ११ लाख झाडी लावली जाणार आहे. तसेच सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी महामार्गाच्या शेजारी सौर पॅनल पण लावले जाणार आहेत. तब्बल १० जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गामुळे तब्बल १४ जिल्ह्यांना फायदा होणार आहे. या मार्गाच्या शेजारी अनेक उद्योग उभारले जाणार आहे. ज्यामुळे या मार्गाच्या परिसरातील जिल्ह्यांचा विकास होणार आहे. मी आणि देवेंद्रजींनी या मार्गावरून प्रवास केला. फडणवीस यांनी त्या दिवशी गाडी चालवली, त्यावेळी पोटातील पाणी सुद्धा हलले नाही. या मार्गामुळे विकासाची गंगा राज्यात येणार असून २४ जिल्ह्याला हा फायदेशीर ठरणार आहे. या मार्गामुळे खऱ्या अर्थाने कष्टकरी, शेतकरी यांचा विकास होणार आहे. हा मार्ग मध्यप्रदेश , तेलंगण यांना जोडणारा इंटर स्टेट कनेक्टटीव्हिटी मार्ग असणार आहे. हा मार्ग बंधने कठीण होते, आव्हानात्मक होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प आम्ही प्रभावी आणि वेगाने राबवत आहोत. डबल इंजिन म्हणून आमच्या सरकारला हिनवले जात आहे. आमचे सरकार डबल इंजिनचे असले तर हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे आहे. मुख्यमंत्री झाल्यावर तुम्ही म्हटला होता की तुम्ही विकास करा, मी तुमच्या पाठीशी आहे. या पुढेही आम्ही तुमचे सहकार्य अपेक्षित आहे. आम्ही मेहनत करणारे लोक आहोत. त्यामुळे भविष्यातही तुमचे सहकार्य अपेक्षित आहे, असे देखील शिंदे म्हणाले. जी २० बैठकीबाबत माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले, जी २० ची संधी मिळणे ही देशासाठी गौरवाची बाब आहे. आम्ही तुमच्या नेतृत्वात यशस्वी करू असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
संबंधित बातम्या
विभाग