Hera Pheri 3: अक्षय कुमार ‘हेरा फेरी ३’मध्ये परतला; परेश रावल, सुनील शेट्टीसह घेतली निर्मात्यांची भेट!
Hera Pheri 3: चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्यासोबतचे वाद आणि या चित्रपटाची कथा आवडली नसल्याचे कारण देत अक्षय कुमारने स्वतः आपण या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते.
Hera Pheri 3: 'हेरा फेरी' या चित्रपटाचा सिक्वेल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. या सुपरहिट चित्रपटाच्या दोन भागांमध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मात्र, ‘हेरा फेरी ३’मध्ये अक्षय कुमार दिसणार नसल्याचे बोलले जात होते. अक्षय कुमारने स्वतः या चित्रपटातून बाहेर पडल्याची घोषणा केली होती. मात्र, आता अक्षयने माघार घेतली असून, पिंकविलाच्या वृत्तानुसार, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'साठी मुंबईत फिरोज नाडियादवाला यांची भेट घेतली आहे.
‘हेरा फेरी ३’ची घोषणा झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले होते. या सगळ्या चर्चांदरम्यान अभिनेता अक्षय कुमार याने चित्रपटातून काढता पाय घेतल्याचे म्हटले जात होते. यानंतर कलाकारांसह चाहत्यांनी देखील अक्षय कुमारने या चित्रपटात काम करावे, असा आग्रह धरला होता. त्यानंतर आता स्वतः अक्षय कुमार याने निर्मात्यांची भेट घेतल्याने तो पुन्हा या चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये फिरोज नाडियादवालाची भेट घेतली. या भेटीने तीनही कलाकारांना एकत्र आणले होते. तिघांनीही आपापल्या भूमिकेत परतण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे आता म्हटले जात आहे.
चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्यासोबतचे वाद आणि या चित्रपटाची कथा आवडली नसल्याचे कारण देत अक्षय कुमारने स्वतः आपण या चित्रपटातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, अक्षय कुमार-साजिद नाडियादवाला यांच्यातील मैत्री आणि साजिद-फिरोज नाडियादवाला या भावांमधील वैर अक्षय कुमारच्या एक्झिटसाठी कारणीभूत असल्याचे म्हटले गेले. तर, आता प्रेक्षकांची मागणी आणि आग्रह लक्षात घेऊन अक्षय पुन्हा एकदा या चित्रपटात परतणार आहे.