सलमानच्या 'कभी ईद कभी दिवाली'मधून आयुष शर्मा बाहेर, प्रोडक्शन टीमसोबत वाद
अभिनेता आयुष शर्मा देखील या चित्रपटात काम करणार होता. आता आयुषने एक दिवसाचं चित्रीकरण करून चित्रपटाला रामराम केल्याचं समजतंय.
बॉलिवूडचा भाईजान असलेला सलमान खान (salman khan) याचा 'कभी ईद कभी दिवाली' (kabhi eid kabhi diwali) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच सलमानने या चित्रपटातील त्याचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यानंतर अभिनेत्री पूजा हेगडे हिने देखील हटके अंदाजात चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं होतं. शेहनाज गिल देखील चित्रपटाच्या सेटवर दिसली होती. चित्रपटाचं चित्रीकरणही सुरू झालं होतं. सलमानच्या बहिणीचा नवरा आणि अभिनेता आयुष शर्मा (aayush sharma) देखील या चित्रपटात काम करणार होता. मात्र आता आयुषने एक दिवसाचं चित्रीकरण करून चित्रपटाला रामराम केल्याचं समजतंय.
आयुष आणि अभिनेता जहीर इकबाल दोघेही या चित्रपटात काम करणार होते. त्यांनी या चित्रपटासाठी एका दिवसाचं चित्रीकरण देखील पूर्ण केलं होतं. मात्र सुरुवातीपासूनच आयुषचा प्रोडक्शन टीम मधील क्रिएटिव्ससोबत वाद सुरु होता. आता चित्रीकरण सुरू झाल्यावर हा वाद विकोपाला गेला त्यामुळे आयुषने चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रोडक्शन टीममधील एका व्यक्तीने म्हटलं, 'चित्रपटाच्या टीमने आधीच त्यावर काम आणि चित्रीकरण सुरू केलं होतं. मात्र आता आयुष आणि क्रिएटिव्समधलं भांडण जास्त वाढलं आहे.' त्यामुळे आयुषने या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आयुषसोबतच जहीरने देखील चित्रपटाला रामराम केला आहे.
आयुष आणि जहीर बाहेर झाल्याने त्यांच्या जागी नव्या अभिनेत्यांचा शोध सुरु आहे. आयुष आणि जहीरच्या भूमिकेसाठी अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानी आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान यांचा विचार करण्यात येत आहे. मात्र आता आयुष आणि जहीरच्या जाण्याने चित्रपटाचं प्रदर्शन पुढे जाण्याची शक्यता आहे. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
विभाग