Ishant Sharma : हसीन जहाँमुळं शमीचं आयुष्य नरक झालं होतं; इशांत शर्मानं सांगितला 'तो' किस्सा
Ishant Sharma on Hasin jahan : हसीन जहाँमुळे मोहम्मद शमीला कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावा लागले, याबाबत इशान शर्माने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.
Ishant Sharma on Hasin jahan : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची गणना जगभरातील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये केली जाते. मोहम्मद शमीने त्याच्या कारकिर्दीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण शमीला त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. दरम्यान, २०१८ वर्ष शमीसाठी अत्यंत वाईट गेले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यावेळी त्याची पत्नी हसीन जहाँने शमीवर अनेक गंभीर आरोप केले होते. ज्यात घरगुती हिंसाचारासह मॅच फिक्सिंगसारख्या आरोपांचाही समावेश होता. या काळात शमीला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? याबाबत भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे.
क्रिकबझच्या राईज ऑफ न्यू इंडिया या कार्यक्रमात इशांत शर्माने शमीसोबत घडलेल्या अनेक वाईट गोष्टींचा अनुभव सांगितला आहे. "हसीन जहाँने शमीवर मॅच फिक्सिंगचे आरोप लावल्यानंतर बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व खेळाडूंशी संपर्क साधला. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शमी मॅच फिक्सिंग करू शकतो का? अशी आमच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी माझा जबाबही नोंदवून घेतला. ते मला सर्व काही विचारत होते आणि सर्वकाही कागदावर लिहित होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, त्याच्या वैयक्तिक समस्यांबद्दल मला माहिती नाही. परंतु, तो मॅच फिक्सिंग करू शकत नाही, याची मला २०० टक्के खात्री आहे", असे इशांत शर्मा म्हणाला.
शमीने एका पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेतल्याचा आरोप हसीन जहाँने लावला होता. ज्यामुळे बीसीसीआयने शमीसोबतचा करारही रद्द केला. त्यानंतर त्याच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात आली. या सर्व आरोपातून शमीची निर्दोष सुटका झाली. परंतु, २०१८ हे वर्ष शमीसाठी कठीण गेले. मात्र, त्यानंतरही त्याने दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात पुनरागमन केले.
विभाग