मनासारखं शिकायला मिळेना, विद्यार्थ्याने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
पालकांनी मुलाशी संपर्क साधला तेव्हा त्याने मला चोरांनी पकडून दुसऱ्या जिल्ह्यात नेलंय. मी कशीबशी माझी सुटका केलीय आणि आता एका ठिकाणी थांबलो असल्याचं सांगितलं.
रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने त्याने हे कृत्य केलं होतं. खेड पोलिसांनी मुलाचा शोध घेत एका रात्रीत संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. मुलाला आयटीआयचे शिक्षण घ्यायचे होते पण घरच्यांना हे सांगता येत नव्हते. बारावीचं शिक्षण घेण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यामुळेच अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली विद्यार्थ्याने पोलिसांसमोर दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खेड पोलिसात ९ नोव्हेंबरला एकाने आपल्या १७ वर्षीय पुतण्याचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. मुलाशी संपर्क साधला तेव्हा त्याने मला चोरांनी पकडून दुसऱ्या जिल्ह्यात नेलंय. मी कशीबशी माझी सुटका केलीय आणि आता एका ठिकाणी थांबलो असल्याचं सांगितलं. मात्र यानंतर पुन्हा मुलाशी संपर्क होऊ शकला नव्हता. तेव्हा पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा त्याला शोधून काढलं त्यानंतर मुलानेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचं समोर आलं.
विद्यार्थ्याची चौकशी करताना त्याने पोलिसांना सांगितले की, मला बारावीचे शिक्षण घेण्यात रस नव्हता. आयटीआयचे शिक्षण घ्यायचं होतं. पण घरच्यांना ही गोष्ट सांगू शकत नव्हतो. म्हणूनच मी घर सोडून गेलो आणि अपहरणाचा बनाव रचला. आता पोलिसांनी त्याचे समुपदेशन करून मुलाला पालकांच्या ताब्यात दिले आहेत.