Nana Patole: शेतकरी आत्महत्येवरून पटोलेंनी सरकारला कोंडीत पकडले; म्हणाले, भाजप विरोधात असताना…
Nana Patole on farmers Suicide: अतिवृष्टी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.
Nana Patole on farmers Suicide: 'भारतीय जनता पक्ष विरोधी बाकांवर असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज शिंदे सरकारवर केली.
विधीमंडळ परिसरात ते मीडियाशी बोलत होते. राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीमुळं शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झालं असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिंदे-फडणवीसांचं सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचं सांगून राज्य सरकार फसवणूक करत आहे. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. आता खताच्या किमतीही तिप्पट झाल्या आहेत. बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहेत. या महागाईच्या तुलनेत सरकारनं जाहीर केलेली मदत अत्यंत कमी आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. केंद्र सरकारनंही हात वर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे. आमची मागणी कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये व बागायती, फळबागेसाठी १.५ लाख रुपये आहे, ती राज्य सरकारने तात्काळ द्यावी, अशी आग्रही मागणी पटोले यांनी केली.
'मी स्वतः अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली आहे. राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती आहे, पण सरकार मात्र शेतकऱ्यांकडं दुर्लक्ष करत असल्याची भावना निर्माण झाली आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचं लोणी खाणारं हे सरकार आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करूनही सरकार उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे, असा संतापही पटोले यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या
विभाग