Akash Madhwal Record : मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स संघात बुधवारी झालेल्या सामन्यात मुंबईनं लखनऊचा सहज पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आकाश मधवाल हा या विजयाचा हिरो ठरला. त्यानं पाच धावांत ५ गडी बाद करत संपूर्ण सामना फिरवला. त्यामुळं सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये आकाशच्या नावाचीच चर्चा आहे.
जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजीची धुरा कोण वाहणार याची चिंता होती. कर्णधार रोहित शर्मा यानं आकाश मधवालवर विश्वास दाखवला. या संधीचं आकाशनं सोनं केलं. मुंबई संघातून पदार्पण केल्यापासूनच त्याची कामगिरी चमकदार झाली होती, परंतु लखनऊ विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्यानं कमाल केली. टी-२० क्रिकेटमध्ये ५ धावांत ५ बळी घेण्याची किमया केली. त्याच्या या कामगिरीनंतर त्याच्याबद्दल माहिती घेतली जाऊ लागली आहे. आकाश मधवाल कोण आहे आणि हा खेळाडू कुठून आला? हे प्रश्न विचारले जात आहेत. जाणून घेऊया आकाश मधवालचा प्रवास…
आकाश मधवाल हा २९ वर्षांचा आहे. ज्या वयात टी-२० क्रिकेटमधील कारकीर्द उताराला लागलेली असते, त्या वयात आकाशला संधी मिळाली. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत आकाश फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळला. वसीम जाफर हा मधवालच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला. उत्तराखंडचा प्रशिक्षक असताना जाफरची नजर आकाशवर पडली आणि माधवालच्या गोलंदाजीनं भारताचा माजी सलामीवीराला प्रभावित केलं. यानंतर २०१९ मध्ये पहिल्यांदा आकाश पहिल्यांदाच चाचणीसाठी गेला होता. पदार्पणानंतर मधवालच्या कारकिर्दीचा आलेख उंचावत गेला आणि २०२२-२३ मध्ये व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये उत्तराखंडचा कर्णधार म्हणूनही नियुक्त करण्यात आलं.
आकाश मधवाल हा इंजिनीअर आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतरच त्यानं आपली आवड जोपासली. आयपीएलमध्ये खेळणारा उत्तराखंडचा तो पहिला खेळाडू आहे.
आकाश मधवाल आणि ऋषभ पंत हे दोघे प्रशिक्षक अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली खेळले आहेत. पंत लहान वयातच दिल्लीला शिफ्ट झाला, त्यामुळं आकाश हा उत्तराखंडकडून आयपीएल खेळणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तो रुरकीच्या धंदेरा भागातील आहे.
आकाश हा २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या शिबिराचा भाग होता, तो आरसीबीचा नेट बॉलर होता. २०२२ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या आकाशला मुंबई इंडियन्सनं जखमी सूर्यकुमार यादवच्या जागी निवडलं. आकाशची क्षमता पाहून मुंबईनं त्याला या हंगामासाठीही कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यानं अखेर सार्थ ठरवला.
संबंधित बातम्या