Mumbai BJP President: आशिष शेलार यांच्या नियुक्तीमुळं मुंबईत शिवसेनेपुढं आव्हान?
Ashish Shelar to be New BJP President: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती झाल्यामुळं शिवसेनेपुढं नवं आव्हान उभं राहिल्याची चर्चा आहे.
Ashish Shelar Vs Shiv Sena: मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार यांना दुसऱ्यांदा ही जबाबदारी मिळाली आहे. लढवय्ये नेते असलेले आशिष शेलार भाजपला मुंबई महापालिका जिंकून देण्यात मदत करू शकतात, असा पक्षाला विश्वास असल्यामुळंच हा निर्णय घेण्यात आला आहे. शेलार यांच्या निवडीमुळं आधीच अनेक अडचणींचं सामना करणाऱ्या शिवसेनेपुढं नवं आव्हान उभं राहिलं आहे.
राज्यातील सत्तांतरानंतर भाजप व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबई महापालिकेसाठी तुंबळ संघर्ष होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या धक्क्यातून सावरलेल्या उद्धव यांनी मुंबईत पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईत तळागाळात जाळं असलेल्या व गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेनेला टक्कर देणं इतकं सोपं नाही. हे माहीत असलेल्या भाजपनं जाणीवपूर्वक मुंबईची धुरा आशिष शेलार यांच्याकडं सोपवली आहे.
आशिष शेलार हे पक्के मुंबईकर असून या शहराची त्यांना उत्तम माहिती आहे. ते मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आहेत. महापालिकेतील जवळपास सर्व समित्यांवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं महापालिकेचीही त्यांना खडान् खडा माहिती आहे. शेलार हे सध्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. मुस्लिम बहुल असलेल्या या मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. मुंबईतील साहित्य, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा वर्तुळातही त्यांची चांगली उठबस आहे. तडजोडीच्या राजकारणातही ते माहीर आहेत. मुंबईत संघटनात्मक दबदबा असलेल्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळं वेळ पडल्यास ते वेगळी राजकीय गणितं सहज जुळवू शकतात. शिवसेनेतील नगरसेवक गळाला लावणं हे देखील आगामी निवडणुकीत भाजपची एक रणनीती असेल. त्यातही आशिष शेलार हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
शेलार यांनी यापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यामुळं मुंबई भाजपवर त्यांची पकड आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपनं त्यांच्याच नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची निवडणूक लढली होती. त्यात भाजपनं घवघवीत यश मिळवत सत्तेपर्यंत मजल मारली होती. त्यावेळी शिवसेनेच्या खालोखाल भाजपला ८३ जागा मिळाल्या होत्या. ही संख्या केवळ दोनने कमी होती. त्याचवेळी महापालिका भाजपच्या हातात आली असती मात्र राज्यातील सत्तेमुळं भाजपला तडजोड करावी लागली होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत महापालिका सोडायची नाही असा निर्धार भाजपनं केला आहे. आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा निवड हा त्याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे. शिवसेना शेलार यांच्या राजकीय डावपेचांना कसं उत्तर देते, हे आता पाहावं लागणार आहे.
विभाग