Pawar vs Pawar : शरद पवारांविरुद्ध बोलले म्हणून लोक अजित पवारांची बिर्याणी न खाता निघून गेले; मोठ्या नेत्याचा दावा
Feb 23, 2024, 06:41 PM IST
Nana Patole on Baramati : अजित पवार यांच्या पक्षानं कितीही दावा केला तरी बारामतीची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादीच जिंकणार, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Nana Patole on Baramati : अजित पवार यांच्या पक्षानं कितीही दावा केला तरी बारामतीची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादीच जिंकणार, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Nana Patole on Baramati : अजित पवार यांच्या पक्षानं कितीही दावा केला तरी बारामतीची जागा शरद पवार यांची राष्ट्रवादीच जिंकणार, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Nana Patole on Lok Sabha Election 2024 : ‘अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवार यांच्या विरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले,' असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप व त्याच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागपूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्यानं राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर, दोन्हीकडून आतापासूनच विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. पटोले यांनी देखील आज महायुतीचा मोठा पराभव करू, असा निर्धार बोलून दाखवला.
भाजपला हद्दपार करणं हाच उद्देश
'जागावाटपावरून महाविकास आघाडीत कसलेही मतभेद किंवा गोंधळ नाही. गोंधळ हा महायुतीत आहे, त्यांच्यात काहीच ताळमेळ नाही. मविआतील सर्व मित्र पक्षांशी चर्चा सुरू असून बहुतांश जागा निश्चित झाल्या आहेत, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बारामतीही महाविकास आघाडीच जिंकणार!
महायुतीचं वातावरण राज्यात कुठंच नाही, ते फक्त जाहिरातीतच दिसत आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत वर्तमानपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू आहे परंतु जनभावना वेगळी आहे. निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजप व त्यांच्या मित्रपक्षांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामतीच्या जागेवरही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून येणार आहे. भाजप व त्यांचे मित्रपक्ष मीडियातून वातावरण निर्मिती करत आहेत. प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. अजित पवार यांनी बारामतीत बिर्याणीचा कार्यक्रम ठेवला होता परंतु ते शरद पवारांविरोधात बोलायला लागले की लोक निघून गेले, असा दावाही पटोले यांनी केला.
'शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. एका हातात मशाल व दुसऱ्या हातात तुतारी हा भाजपच्या तानाशाहीला संदेश आहे. या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म दिला परंतु या अत्याचारी व्यवस्थेनं त्यांचा पक्ष व घड्याळ चिन्हही चोरून घेतलं, अशी टीकाही पटोले यांनी केली.
सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा, तेवढा खेळा!
काँग्रेसमधून काही लोक बाहेर जात आहेत या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, सत्तेच्या जोरावर त्यांना जेवढे घ्यायचे आहेत तेवढे घेऊ द्या. सत्तेच्या जोरावर जेवढा खेळ खेळायचा तेवढा त्यांना खेळू द्या, आम्ही एकच हातोडा मारू मग त्यांना कळेल, असंही पटोले म्हणाले.