मविआच्या बॅनरमधून राहुल गांधींचा फोटो गायब; शिवसेना-काँग्रेसमधील वादामुळं राजकीय चर्चांना उधाण
Apr 01, 2023, 08:38 PM IST
- Mahavikas Aghadi Sabha : महाविकास आघाडीची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.
Mahavikas Aghadi Sabha : महाविकास आघाडीची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.
- Mahavikas Aghadi Sabha : महाविकास आघाडीची उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संयुक्त सभा होणार आहे. त्यासाठी ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.
MVA Rally In Chhatrapati Sambhaji Nagar : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महाविकास आघाडीनं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सभांचं नियोजन केलं आहे. महाविकास आघाडीची पहिली सभा ही उद्या छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे. या सभेला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहे. मविआच्या सभेचा एक टीझरही सोशल मीडियावर जारी करण्यात आला आहे. परंतु मविआचा टीझर आणि पोस्टर्समधून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोटो गायब आहे. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मविआच्या सभेचे बँनर्स लावण्यात आले आहेत. त्यातही राहुल गांधी यांचा फोटो लावण्यात न आल्यामुळं आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेतून त्यांना चांगलंच सुनावलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. परंतु आता राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून ठाकरे गट अडचणीत सापडलेला असतानाच मविआच्या सभेतल्या बॅनरवर राहुल गांधींचा फोटो लावण्यात आलेला नाही. त्यामुळं आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचं बोललं जात आहे.
मविआच्या बॅनरवर कुणाचे फोटो आहेत?
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी छत्रपती संभाजीनगरमधील सभेत शांतता बाळगावी. जाती-धर्मात भांडणं लावून मविआच्या सभेला गालबोट लावण्याचं प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळं मविआचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून कोणत्याही घोषणा अथवा हुल्लडबाजी केली जाऊ नयेत, याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दावने यांनी म्हटलं आहे.