Pen Ganpati News : एका पावसात होत्याचं नव्हतं झालं, पेणच्या मूर्तीकारांना कोट्यावधींचा फटका
Jul 28, 2023, 10:20 AM IST
Pen Ganpati News : एका जोरदार पावसाने बाळगंगा नदीने आपलं पात्र सोडलं आणि त्याचा फटका पेणच्या मूर्तीकारांना बसला.
Pen Ganpati News : एका जोरदार पावसाने बाळगंगा नदीने आपलं पात्र सोडलं आणि त्याचा फटका पेणच्या मूर्तीकारांना बसला.
Pen Ganpati News : एका जोरदार पावसाने बाळगंगा नदीने आपलं पात्र सोडलं आणि त्याचा फटका पेणच्या मूर्तीकारांना बसला.
“बाळगंगा नदीने पात्र सोडलं आणि नदीच्या पाण्याने आमच्या कारखान्यांच्या भिंती पाडल्या, एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं, आमच्या दीडशे कारखान्यांमध्ये नदीचे पाणी शिरलं, आमचं साहित्य,मूर्ती सारकाही हिरावून नेलं”, पेणच्या मूर्तीकारांना अश्रू अनावर होत आहेत.
संपूर्ण रायगड, सिंधुदुर्ग,मुंबई,ठाणे आणि पालघरला गुरूवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसा पाऊसही धुवादार पडला. पावसाच्या त्या रूपानं नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आणि नद्यांनी आपलं पात्र सोडलं. काही नद्यांचं पाणी शेतीत आलं, तर काही नद्यांनी गणेश कार्यशाळांना आपलं लक्ष्य केलं.
पेणच्या गणेशमूर्तींची ओळख म्हणजे इथल्या कार्यशाळेत बनणारे गणपती मुंबईपुण्यातच नव्हे तर देशविदेशी जातात. आपल्या कलाकुसरीने वाहवा मिळवतात. मुंबई पुण्यातल्या गणेश मंडळांसाठी म्हणा किंवा घरगुती गणपतींसाठी म्हणा, पेण हे गणेशमूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण. एरवी या विघ्नहर्त्याचं रूप साकारायला इथले हात थांबत नाहीत. मात्र गुरुवारी झालेल्या पावसात या मूर्तीकारांचं साहित्यही नदीने आपल्या जबड्यात गिळंकृत केलं आहे आणि त्या मूर्तीकारांना हात चोळत बसण्याखेरीज काहीच पर्याय उरला नाहीये.
बाळगंगा नदीने आपलं पात्र सोडलं आणि तब्बल दीडशे कारखान्यांना आपलं लक्ष्य केलं. त्या विध्वंसात मातीच्या गणेशमूर्ती पुन्हा मातीतच मिसळल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पाण्यात वाहून गेल्या. गणेश मूर्ती साकारण्याचं साहित्यही या नदीने गिळलं.
तब्बल दीडशे कारखान्यांना बसला फटका
बाळगंगा नदीने आपलं पात्र सोडल्याचा फटका इथल्या दीडशे कारखान्यांना बसला आहे. इथल्या प्रत्येक कारखान्याचं किमान साडेतीन ते चार लाखांचं नुकसान झालं आहे. हा आकडा दीडशेने मोजल्यास किमान साडेचार ते पाच कोटींच्या घरात जातो. एका पावसाच्या रौद्र रूपाने हे इतकं भयंकर नुकसान या गणेश मूर्तीकारांचं झालंय.
गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं म्हटलं जातं. यंदा मात्र निसर्गाचा प्रकोप या मूर्तीकारांना असा बसलाय की सर्वत्र पसरलेला चिखल किंवा गाळ काढायलाच आता काही दिवस खर्ची घालावे लागणार आहेत. त्यानंतर ज्या मूर्ती वाचवण्यात यश आलं आहे त्या मूर्ती माळ्यावरून काढून पुन्हा त्यांच्यावर एक हात फिरवावा लागणार आहे. त्यानंतर वेळ मिळाला तर नव्या मूर्ती. अन्यथा यंदा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव असूनही या मंडळींना यंदाचा गणेशोत्सव साश्रूनयनांनी घालवावा लागणार आहे.