Priyanka to Modi : कॉंग्रेसने ७० वर्षात काय केलं? प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘मोदी शिकले ती शाळाही… '
Nov 08, 2023, 06:35 PM IST
कॉंग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षात देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सारखं विचारत असतात. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या या प्रश्नाचे आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
कॉंग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षात देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सारखं विचारत असतात. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या या प्रश्नाचे आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
कॉंग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षात देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सारखं विचारत असतात. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या या प्रश्नाचे आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची प्रचारधुमाळी जोरात सुरू आहे. भाजप आणि कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते निवडणूक प्रचारासाठी उतरले असून प्रचार सभांमध्ये मतदारांसमोर आश्वासनांची खैरात देताना एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी सध्या मध्य प्रदेशात प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. इंदूर जिल्ह्यात सांवेर विधानसभा मतदारसंघात एका प्रचारसभेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एम.ए. (एन्टायर पॉलिटिकल सायन्स) या पदव्युत्तर प्रमाणपत्राबाबत फिरकी घेतली. कॉंग्रेस पक्षाने गेल्या ७० वर्षात देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान मोदी प्रचार सभांमध्ये विचारत असतात. प्रियंका गांधी यांनी मोदींच्या या प्रश्नाचे आपल्या शैलीत उत्तर दिले.
प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘गेल्या ७० वर्षात कॉंग्रेसने काय केलं? देशाचा काय विकास केला? असं पंतप्रधान मोदी विचारत असतात. गेल्या ७० वर्षात देशात काहीच विकास झाला नसता तर मग मोदीजी शाळेत कसे गेले असते बरं? मोदीजी ज्या शाळेत गेले ती शाळासुद्धा कॉंग्रेसच्याच काळात बांधली गेली असणार. मोदीजी ज्या कॉलेजमध्ये गेले ते कॉलेज सुद्धा कॉंग्रेसच्याच काळात बांधले गेले असणार. मोदी हे खरोखरच कॉलेजमध्ये गेले होते की नाही, हे मला माहित नाही. परंतु मोदींकडे जे ‘एन्टायर पॉलिटिकल सायन्स’ विषयाचे पदव्युत्तर पदवीचे प्रमाणपत्र आहे ते नक्कीच कॉंग्रेसने दिलेल्या कॉम्प्युटरवर छापले गेले असणार’ असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला.
राजीव गांधींमुळे भारतात कॉम्प्युटर आला
प्रियंका गांधी यांनी प्रचार सभेत भाषण करताना माजी पंतप्रधान, दिवंगत राजीव गांधी यांची आठवण उधृक्त केली. त्या म्हणाल्या, ‘माझे वडील देशाचे पंतप्रधान असताना ते देशात कॉम्प्युटर आणू इच्छित होते. तेव्हा याच भाजपवाल्यांनी त्यांना विरोध केला होता. राजीव गांधी यांच्या धोरणामुळे देश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात फार पुढे गेला असल्याचं प्रियंका म्हणाल्या. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी दूरदृष्टी ठेवून आयआयएम, आयआयटी सारख्या दर्जेदार शिक्षण संस्था आणि एम्ससारखे मोठे हॉस्पिटल उभारले असल्याची आठवण प्रियंका यांनी करून दिली.
मध्य प्रदेशमध्ये भ्रष्ट सरकार
या प्रचारसभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर टीका केली. या राज्यात भ्रष्ट सरकार असून सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून लोकांच्या फायद्याच्या योजना न राबवता लोकांची संपत्ती मोठमोठ्या उद्योगपतींना देत असल्याचा आरोप त्यांनी केला.