Shiv Sena on PM Modi: नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कधी होणार?; शिवसेना असं का म्हणाली?
Oct 13, 2022, 10:28 AM IST
- Saamana Editorial on Narendra Modi: काश्मीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरू यांना दोष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
Saamana Editorial on Narendra Modi: काश्मीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरू यांना दोष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
- Saamana Editorial on Narendra Modi: काश्मीरच्या मुद्द्यावरून पंडित नेहरू यांना दोष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार हल्ला करण्यात आला आहे.
Saamana Editorial on Narendra Modi: गुजरातमधील निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा पंडित नेहरू यांच्याकडं वळवला आहे. काश्मीर प्रश्न नेहरूंमुळं निर्माण झाल्याचं त्यांनी सूचित केल्यामुळं राजकीय वादंग सुरू झालं आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. ‘मोदी हे जगाचे नेते झाले, पण देशाचे पंतप्रधान कधी होणार?,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना केवळ काश्मीरचा एक प्रश्न सोडवता आला नाही. काश्मीरचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आज आपण सरदार पटेल यांनी दाखवलेल्या मार्गानेच जात आहोत, असं वक्तव्य मोदी यांनी गुजरातमध्ये केलं. त्यावरून शिवसेनेनं मोदी सरकारच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'नेहरूंना काश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारनं त्याच प्रश्नावर मतं मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची काश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलंत? काश्मीरात गेल्या पाच महिन्यांपासून काश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग वाढलं आहे. पंडित भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. रशिया-युक्रेन युद्धावर आपले पंतप्रधान बोलतात, पण काश्मीरातील घडामोडींचं खापर नेहरूंवर फोडून मोकळे होतात. काश्मीरमध्ये आजही पंडित मारले जात आहेत व पलायन करीत आहेत. यात नेहरूंचा काय दोष?, असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे.
'मागच्या आठवड्यात गृहमंत्री अमित शहा काश्मीर दौऱ्यावर असताना राज्याच्या पोलीस महासंचालकांची हत्या झाली. हे आता रोजचंच झालं आहे. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत अनंतनाग इथं पंडितांसाठी वसाहत उभी केली. तिथं तर आता स्मशानशांतता आहे. सुरक्षा कडे आहे, पण बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतण्याची खात्री नाही. कश्मीरमध्ये पंडित व इतर हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. पंतप्रधानांपर्यंत ही सत्य माहिती पोहोचू नये, याबद्दल शिवसेनेनं आश्चर्य व्यक्त केलं आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील एक महान नेते आहेत, मात्र त्यांना जगातील घडामोडींविषयी जितकी इत्यंभूत माहिती आहे, तेवढी आपल्या देशातील घडामोडींविषयी आहे काय, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.
ऐन निवडणुकीत मोदींना जातीची आठवण का होते?
माझी जात न पाहता गुजरातच्या जनतेनं मला पाठिंबा दिला, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होता. त्याचाही शिवसेनेनं समाचार घेतला आहे. 'ऐन निवडणुकीत मोदी यांना आपल्या जातीची आठवण का व्हावी? मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत याचा विसर त्यांना गुजरातला गेल्यावर अनेकदा पडतो. पंतप्रधानांच्या मनात स्वतःची जात असावी हे बरं नाही. जात विसरायला हवी. जात नाही ती जात या सावटातून त्यांनी बाहेर पडलं पाहिजे. मोदी यांना देशभरातून मतदान झालं. अनेक मोठ्या राज्यांनी मोदींना भरघोस मतदान केलं. तिथं जातीचा प्रश्न येतोच कुठं? त्यामुळं गुजरातच्या भूमीवर अशा प्रकारे जातपंचायत लावण्याची गरज नव्हती, असा टोलाही अग्रलेखातून हाणण्यात आला आहे. भाजपनं मोदींना निवडणुका जिंकणारा यंत्रमानव बनवून टाकलं आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.