Baramati: 'सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेकडे उगवेल, पण बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही'
Sep 07, 2022, 02:16 PM IST
- Jayant Patil on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांपुढं आव्हान उभं करण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपला जयंत पाटील यांनी टोला हाणला आहे.
Jayant Patil on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांपुढं आव्हान उभं करण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपला जयंत पाटील यांनी टोला हाणला आहे.
- Jayant Patil on Baramati: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबीयांपुढं आव्हान उभं करण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपला जयंत पाटील यांनी टोला हाणला आहे.
Jayant Patil on Baramati: शिवसेनेत फूट पाडण्यात यश आल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडं वळवला आहे. पवार कुटुंबीयांचा गड असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी तसं वक्तव्यही केलं आहे. भाजपच्या या खटाटोपाची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी भाजप आणि भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
'बारामतीमधील जनता कशी आहे याची आम्हाला पूर्ण माहिती आहे. त्यामुळं कुणीही बारामतीत आलं तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्या वेळी पश्चिमेकडे उगवेल, परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही एवढं ते घट्ट नातं आहे, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
'बारामतीत उमेदवार कोण द्यायचा हे भाजप ठरवेल. बारामती सध्या भाजपनं टार्गेट केली आहे शिवाय आम्हालाही लक्ष्य केलं गेलंय, असं बोललं जातंय. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतोय अशी हवा करून मीडियासमोर जाण्याची भाजपची कार्यपद्धती आहे. थोड्या दिवसात आमचाही प्लॅन मांडेन, त्यावेळी कुणाकुणाला टार्गेट करतोय हे तुमच्याही लक्षात येईल, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
लोकप्रियता कमी झाली की भाजप असं काहीतरी करते!
'सत्ता आहे तर सत्तेत राहून लोकांची कामे करायची सोडून भाजप निवडणुकीची तयारी करतोय. याचा अर्थ आपली लोकप्रियता कमी व्हायला लागलीय हे भाजपच्या लक्षात यायला लागलं आहे आणि जेव्हा त्यांची लोकप्रियता कमी होते, तेव्हा अशा गोष्टी भाजप करतो, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.
बावनकुळेंना साधं तिकीट मिळालं नव्हतं!
बारामतीमध्ये जाऊन निवडणुका जिंकण्याची भाषा करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला. 'चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं विधानसभेचं तिकीटही नाकारलं होतं. ते का नाकारलं याची चर्चा मी करू इच्छित नाही, परंतु बावनकुळे यांनी शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर अशा पध्दतीने बोलणं त्यांना शोभत नाही, असं पाटील यांनी सुनावलं.
विभाग