Nashik : पिकाला भाव नाही, इच्छामरणाची परवानगी द्या; नाशिकमधील १०१ शेतकऱ्यांचं राष्ट्रपतींना पत्र
Mar 05, 2023, 10:00 PM IST
- Chandwad Nashik Farmers : गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह द्राक्षाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे.
Chandwad Nashik Farmers : गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह द्राक्षाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे.
- Chandwad Nashik Farmers : गेल्या काही दिवसांपासून कांद्यासह द्राक्षाच्या भावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे.
Nashik Farmers Letter To President Draupadi Murmu : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कापूस, कांदा आणि द्राक्षांच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा एक रुपया प्रतिकिलो दरानं विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासह भाजीपाला रस्त्यावर फेकून केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. त्यातच आता नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या १०१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. कांद्यासह द्राक्ष आणि भाजीपाल्यांना योग्य भाव मिळत नसल्यामुळं संतापलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्याची माहिती समोर आल्यामुळं आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यातील अनेक मार्केटमध्ये कांदा, द्राक्ष आणि भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामुळं निराश झालेल्या नाशिकच्या चांदवडमधील १०१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणासाठी परवानगी मागितली आहे. चांदवड तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त कांदा आणि द्राक्ष पीक घेणारा तालुका ओळखला जातो. त्यामुळं आता याचा राज्यासह देशातील मार्केटवर परिणाम होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीमुळं शेतकऱ्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे, याचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
कांदा, द्राक्षे आणि भाजीपाल्याचा भाव कोसळल्यामुळं शेतीमालाच्या उत्पन्नाचा खर्चही निघत नाहीये. परिणामी शेतकऱ्यांना आणखी कर्ज काढावं लागत आहे. त्यामुळं कुटुंबाचं पालनपोषण करणंही शेतकऱ्यांना अवघड झालेलं असून केंद्र सरकारच्या कृषिधोरणामुळं शेतकऱ्यांना प्राणत्याग केल्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नसल्याचं शेतकरी संजय जाधव यांनी म्हटलं आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणताही आवाज उठवत नसल्यामुळंही शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.