Ind Vs Eng: टीम इंडिया कुठे कमी पडली?; माजी क्रिकेटपटूनं नेमक्या शब्दांत सांगितलं!
Nov 11, 2022, 11:44 AM IST
T20 World Cup: टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर गेल्याचे तीव्र पडसाद देशातील क्रीडा वर्तुळात उमटत आहेत. माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली आहे.
T20 World Cup: टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर गेल्याचे तीव्र पडसाद देशातील क्रीडा वर्तुळात उमटत आहेत. माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली आहे.
T20 World Cup: टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर गेल्याचे तीव्र पडसाद देशातील क्रीडा वर्तुळात उमटत आहेत. माजी क्रिकेटपटूंनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Aakash Chopra on Team India Defeat: टी-२० विश्वचषकाच्या उपांत फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून झालेल्या भारताच्या दणदणीत पराभवाचं कवित्व आणखी बराच काळ सुरू राहण्याची चिन्हं आहेत. या पराभवामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. कर्णधार रोहित शर्मा व संघ निवड समितीवर टीकेची झोड उठली आहे, तर दुसरीकडं जुने-जाणते क्रिकेटपटू टीम इंडियाच्या चुकांचे पाढे वाचत आहेत. 'विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाची रणनीती पुरती चुकली. आशिया चषकातील चुकांची पुनरावृत्ती यावेळी करण्यात आली,' असं परखड मत माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा यानं नोंदवलं आहे.
यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आकाश चोप्रा यानं भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचं विश्लेषण केलं आहे. ‘सेमीफायनलच्या आधी पाकिस्तान, नेदरलँड्स, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात तुम्ही कशीही कामगिरी केलेली असो, परंतु इंग्लंडविरुद्धचा सामना सर्वात महत्त्वाचा होता. वर्षभराची तयारी या सामन्यात दिसायला हवी होती. सपाट खेळपट्टीवर फलंदाजी करायची होती. इंग्लंडची फलंदाजी तगडी आहे, मात्र गोलंदाजीत ते कमी पडतात हे ओळखून भारतानं आपला खेळ करायला हवा होता,’ असं आकाश चोप्रा म्हणाला.
फलंदाजी फ्लॉप
‘प्रथम फलंदाजी करताना या मैदानावर किमान २०० धावांचं लक्ष्य ठेवणं गरजेचं होतं, पण आपण १६८ धावांपर्यंतच आपण कशीबशी मजल मारली. जेमतेम चेंडूगणिक धावा काढल्या. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करायचा यासाठी तयारी केली होती, पण तसं कुठंच दिसलं नाही. इतर सामने सोडा, या सामन्यात तरी ते दिसायला हवं होतं,’ असं आकाश चोप्रा म्हणाला. 'ऐन मोक्याच्या क्षणी जे करायला हवं, ते करता आलं नाही तर ध्येयाला काही अर्थ राहत नाही. तुम्ही खेळावर वर्चस्व गाजवू शकला नाही तर चित्र बदलणं शक्यच नाही, असंही त्यानं सांगितलं.
संघ निवडीत घोळ
संघ निवडीच्या बाबतीतही आकाश चोप्रा यानं आक्षेप नोंदवला. ‘तुम्हाला हे आशिया माहित आहे. ‘दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी कोणाला विश्वचषकात खेळवायचं याचा अंदाज आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीवरूनच यायला हवा होता. किमान द्विपक्षीय मालिकेनंतर तरी हा निर्णय व्हायला हवा होता, पण तेही झालं नाही,’ अशी खंतही चोप्रानं व्यक्त केली.
फलंदाजीचा क्रम चुकला
'ऑस्ट्रेलियात सराव सामने खेळल्यानंतर टीम इंडियाला काही गोष्टींचा अंदाज यायला हवा होता. लेगस्पिनरच्या गोलंदाजीवर तुटून पडण्यासाठी ऋषभ पंत उपयुक्त ठरेल हे उशिरा कळलं. त्याला संधीही मिळाली पण तो कोणत्या नंबरवर फलंदाजी करणार हेच निश्चित नव्हतं. स्पिनर गोलंदाजांचा कोटा संपला तेव्हा ऋषभ फलंदाजीला आला. त्याला मधल्या षटकांत खेळवायला हवं होतं, असंही आकाश चोप्रा म्हणाला.