
T20 World Cup: टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध दारूण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. भारताने ६ पैकी २ सामने गमावले. त्यात दक्षिण आफ्रिकेनं सुपर १२ फेरीत तर इंग्लंडने सेमीफायनलमध्ये हरवलं. या दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक अशी होती. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांचा अंतिम सामना होईल अशी अपेक्षा चाहत्यांची होती. मात्र भारताच्या या कामगिरीमुळे माजी क्रिकेटपटूंसह चाहते निराश झाले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघावर टीका करताना खिल्ली उडवली आहे.
शोएब अख्तरने म्हटलं की, भारतासाठी हा लाजीरवाणा पराभव आहे. भारत खूप वाईट खेळला आणि पराभवच त्यांच्यासाठी योग्य होता. अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी ते पात्र नव्हते. भारत खूप वाईट पद्धतीने पराभूत झाला. त्यांच्या गोलंदाजीची पोलखोल झाली होती. खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी चांगली होती आणि भारताकडे असं कोणीही नव्हतं.
मला नाही माहिती की त्यांनी एकाही सामन्यात चहलला का खेळवलं नाही. खूप संभ्रमात टाकणारी ही निवड आहे. भारतासाठी खरंच वाईट दिवस होता. नाणेफेक जिंकल्यानंतरच सर्वांचे चेहरे पडलेले होते. जेव्हा इंग्लंडने पाच षटके फलंदाजी केली तेव्हा तर भारताने हातच वर केले होते. किमान लढण्याचा तरी प्रयत्न करायला हवा होता. त्यांनी आक्रमकपणा दाखवला नाही असंही अख्तरने म्हटलं.
भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहली आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर ६ बाद १६८ धावा केल्या. त्यानंतर १६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सलामीची जोडी एलेक्स हेल्स आणि कर्णधार जोस बटलर यांनी अभेद्य भागिदारी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. दोघांनीही नाबाद अर्धशतके केली. भारतावर १० गडी राखून विजय मिळवत दिमाखात वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता १३ नोव्हेंबरला त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
संबंधित बातम्या
