Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं, दोन विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या; पोलिसांकडून संशयितांची धरपकड
Sep 26, 2023, 11:48 AM IST
- Manipur Violence News : विद्यार्थांची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Manipur Violence News : विद्यार्थांची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
- Manipur Violence News : विद्यार्थांची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Manipur Violence News Today : तीन महिलांची विवस्त्र धिंड काढून बलात्कार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मणिपुरमधून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यातील मैतेई समाजाच्या दोन विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत विद्यार्थी जुलै महिन्यात बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता दोन्ही विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये शस्त्रधारी व्यक्ती दिसून येत आहे. या घटनेमुळं मणिपूर पुन्हा पेटलं असून पोलिसांनी राज्यात बंदोबस्त वाढवत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात मैतेई समाजाचे विद्यार्थी हिजाम लिनथोइंगबी आणि फिजाम हेमजीत हे अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला होता. परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. अखेरीस घटनेच्या महिन्याभरानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन आरोपी रायफल घेवून धमक्या देत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेवरून मणिपुरात रोष व्यक्त केला जात आहे.
दोन विद्यार्थी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास का केला नाही?, माहिती मिळवण्यासाठी इतका वेळ का लागला?, आणि विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली असताना पोलीस गाफिल कसे काय राहिलेत?, असे प्रश्न मणिपुरमधील लोकांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सोशल मीडियावर देखील या घटनेवरून संताप व्यक्त केला जात आहे. याशिवाय दोन विद्यार्थ्यांच्या हत्येचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार असल्याचं मणिपूर सरकारकडून सांगण्यात आलं आहे.