Manipur Violence : विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर मणिपुरात हिंसाचार; लाठीमारात ४५ लोक जखमी, इंटरनेट सेवा बंद
Sep 27, 2023, 09:06 AM IST
- Manipur Violence : मणिपुरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Manipur Violence : मणिपुरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
- Manipur Violence : मणिपुरमध्ये दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
Manipur Violence News Today : गेल्या काही दिवसांपासून धगधगत असलेलं मणिपूर पुन्हा एकदा पेटल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन विद्यार्थ्यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मणिपुरची राजधानी इंफाळसह राज्यातील अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू झाला आहे. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी केलेल्या लाठीचार्जमध्ये ४५ लोकांना गंभीर मार लागल्याची माहिती समोर आली आहे. लाठीचार्ज करत पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहे. त्यानंतर आता राज्यातील कायदा व सुव्यस्था बिघडत असताना सर्व शाळा आणि महाविद्यालयांना येत्या शुक्रवार पर्यंत सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी घेतला आहे.
जुलै महिन्यात फिजाम हेमजित आणि हिजाम लिनथोइनगांबी या दोन विद्यार्थ्यांचं अज्ञात आरोपींनी अपहरण केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांपासून दोघांच्या मृतदेहांची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर मणिपुरातील अनेक ठिकाणी हिंसेचा भडका उडाला आहे. मैतेई आणि कुकींमध्ये पुन्हा एकदा हिंसक संघर्ष होत असून पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या जमावावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी इंफाळमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या दिशेने निषेध मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक विद्यार्थी आणि सुरक्षा दलांमध्ये झटापट झाली आहे. पोलिसांच्या लाठीमारात ४५ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहे. त्यानंतर जखमींवर इंफाळमधील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
दोन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारने पुढील सहा दिवस मणिपुरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय हिंसाचारग्रस्त भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मैतेई आणि कुकी समाजातील आंदोलकांना शांततेचं आवाहन करण्यात आलं असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.