India Alliance : २०२४ मध्ये प्रियांका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी?; 'इंडिया'च्या बैठकीत काय झालं? वाचा!
Dec 20, 2023, 04:09 PM IST
Mamata Banerjee proposal in India Alliance meeting : प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला आहे.
Mamata Banerjee proposal in India Alliance meeting : प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला आहे.
Mamata Banerjee proposal in India Alliance meeting : प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ममता बॅनर्जी यांनी ठेवला आहे.
Mamata Banerjee at India Alliance meeting : लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेचा आणि बैठकीतील प्रस्तावांचा तपशील हळूहळू बाहेर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढं देखील कडवं आव्हान उभं करण्याची चर्चा देखील या बैठकीत झाल्याचं समजतं.
इंडिया आघाडीच्या बैठकीला देशातील २८ पक्षांचे नेते उपस्थित होते. प्रमुख नेत्यांनी बैठकीला संबोधित केलं. तसंच काही प्रस्ताव मांडले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढं करावं असा प्रस्ताव ठेवला. त्याचबरोबर, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही त्यांनी ठेवला. समाजवादी पक्षासह अन्य सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा जाहीर करावा, असंही त्यांनी सुचवलं.
प्रियांका गांधी यांना मोदींच्या विरोधात उतरवण्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. प्रियांका यांनी मोदींना आव्हान दिल्यास इंडिया आघाडी आणि काँग्रेस सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्वशक्तिनीशी उतरल्याचा संदेश जाईल, असं ममता म्हणाल्या. ममता बॅनर्जी यांच्या प्रस्तावावर काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रियांका गांधी यांना वाराणसीतून काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. अजय राय यांना तिथून उमेदवारी देण्यात आली. राय हे सध्या उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
बैठकीनंतर ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
बैठकीनंतर पत्रकारांनी याबाबत विचारलं असता ममता यांनी सविस्तर बोलण्यास नकार दिला. आम्ही प्रत्येक गोष्ट सांगू शकत नाही. मात्र, ३१ डिसेंबरपर्यंत जागावाटपाची बोलणी पूर्ण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. आधीच खूप वेळ वाया गेला आहे. सर्वात आधी जागावाटप झालं पाहिजे, तर पुढील रणनीतीवर चर्चा होऊ शकते, असं त्या म्हणाल्या.