विदर्भात २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू, पालकांचा संताप
Oct 09, 2023, 08:00 PM IST
- आश्रमशाळेत शिकत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.
आश्रमशाळेत शिकत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.
- आश्रमशाळेत शिकत असलेल्या २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळं राज्यात खळबळ उडाली आहे.
राज्यातील अनेक रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना समोर येत असतानाच आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर येत आहे. घाटंजी तालुक्यातील घोटी येथील आश्रमशाळेत शिकणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. विद्यार्थ्यांनी मळमळ, उलट्या, ताप आणि पोटात त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीने आश्रमशाळेत धाव घेतली असून शाळा प्रशासनाच्या गलथान कारभारावर नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील घोटी येथील आश्रमशाळेत आज दुपारी जेवण केल्यानंतर अचानक मळमळ, उलटी होऊन ताप आला आणि अस्वस्थ वाटू लागले. याची माहिती मिळताच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. आजारी पडलेल्यांपैकी १२ विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून अतिउन्हामुळं त्यांना अशा प्रकारचा त्रास झाला असावा, असं वैद्यकीय अधिकारी अक्षय ठमके यांनी सांगितलं आहे.
आश्रमशाळेचा अजबच दावा-
आमच्या आश्रमशाळेत जेवणातून विषबाधा झाल्याची कुठलीही घटना घडलेली नाही. काही लोकांकडून जाणीवपूर्वक अशी अफवा पसरवली जात असून मुलींना मासिक पाळीवेळी थोडा त्रास झाला, त्यामुळं अन्य विद्यार्थी घाबरले असावेत, असं आश्रमशाळेचे संस्थाचालक साहेबराव पवार यांनी म्हटलं आहे. याशिवाय आश्रमशाळेतील कोणत्याही विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं आहे.