Sanjay Raut| मी करून दाखवलं ते तुम्ही करणार का? राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान
Jun 30, 2022, 11:38 AM IST
- इथली स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून तुम्हाला तिकडे स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
इथली स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून तुम्हाला तिकडे स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
- इथली स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून तुम्हाला तिकडे स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना लगावला.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. राऊतांनी जय महाराष्ट्र असं ट्विट केलं आहे. त्याबाबत विचारले असता सांगितले की, नेहमीच मी सकाळी जय महाराष्ट्र करतो. आज शिवसेनेचं धनुष्यबाण टाकलं. एवढंच कळावं की धनुष्यबाण जिवंत आहे. जय महाराष्ट्र हा आमचा मंत्र आहे. इथं आज बसलोय, शिवसेनेचं मीठ खातो आणि पंधरा मिनिटांनी पळून गेलो, कुठे गेले? ही आमची औलाद नाही असं म्हणत बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी ईडीची नोटीस आली असून त्याला उत्तर देण्यासाठी उद्या ईडी कार्यालयात ते हजर होणार आहेत.
संजय राऊत म्हणाले की, "मी माझी भूमिका स्पष्ट करेन. मला महाराष्ट्राच्या, पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी सर्व दबावाचा प्रकार सुरू आहे. या दबावांना आमचे काही लोक बळी पडले, पळून गेले. तरी मी ईडीसमोर हजर राहीन. कोणतीही कारवाई झाली तरी त्याला सामोरं जाईन." राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना असाही प्रश्न विचारला की, "मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवला, तुम्ही तो करून दाखवणार का? इथली स्वाभिमानाची मीठ भाकरी सोडून तुम्हाला तिकडे स्वत:चा स्वाभिमान गहाण ठेवून चाकरीच करावी लागेल."
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे राजीनामा देण्याआधी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण केली गेली आणि राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी अत्यंत संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. आपल्याच लोकांनी दगाबाजी केली, खंजीर खुपसल्याचंही त्यांनी म्हटलं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर खुर्चीला चिकटून राहण्यात अर्थ नव्हता, कारण ठाकरे कधीच सत्तेचे लोभी नव्हते आणि नाहीत असं राऊतांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं.
बंडखोर आमदारांनी त्यांची नाराजी राष्ट्रवादीवर असल्याचं सातत्यानं म्हटलं आहे. यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शरद पवार आणि काँग्रेस नेतृत्वाने उद्धव ठाकरेंना राज्याची धुरा सांभाळण्याची विनंती केली. आज महाविकास आघाडी विरोधात जे दोष देत आहेत ते मंत्री जेव्हा मंत्रिमंडळात सामील झाले तेव्हा त्यांना उत्तम खाती मिळाली. त्यावेळी कुणीही विरोध केला नाही. महाराष्ट्रात अनोखा प्रयोग होतोय अशी भावना होती, पुढे हाच प्रयोग २५ वर्षे चालावा अशी अपेक्षा त्या लोकांची होती. पण आता काहीही करून बाहेर पडायचं आहे, खंजीर खुपसायचा आहे तर काहीही कारणं देत आहेत."