Police Stopped Congress: गांधी जयंतीनिमित्त ‘इंडिया’ आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखली
Oct 02, 2023, 07:20 PM IST
- पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोप या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोप या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
- पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोप या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.
आज मुंबईत गांधी जयंतीनिमित्त 'इंडिया' आघाडीतील पक्षांकडून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु पदयात्रेत सामील झालेल्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानं पदयात्रेऐवजी कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशनची यात्रा करावी लागली. पोलिसांनी कॉंग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्षाच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांची धरपकड केल्याचा आरोप या पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, पूर्णपणे शांततेने होणार असलेल्या या कार्यक्रमाला कोणत्याही कारणाशिवाय पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला असून हा सगळा प्रकार ब्रिटिश राजची आठवण करून देणारा असल्याची भावना मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
आज सोमवारी गांधी जयंतीनिमित्त आयोजित पदयात्रेत सामील होण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ एकत्र झाले होते. या पदयात्रेसाठी इंडिया आघाडातील पक्षांनी सर्व परवानग्या घेतल्याचा दावा केला आहे. परंतु पोलिसांनी अचानक धरपकड सुरू केल्याने इंडिया आघाडीमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘ब्रिटिशांच्या क्रूर आणि अन्याय्य राजवटीत बापूंच्या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची अशीच धरपकड व्हायची. आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शांततापूर्ण पदयात्रेतही पोलिसांची दंडेलशाही सुरू आहे. हे नेमकं कोणाचं राज्य सुरू आहे, भारतात लोकशाही असताना शांततेच्या मार्गाने होणाऱ्या पदयात्रेत दंडेलशाही करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला?’ असा संतप्त सवाल कॉंग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला.
सचिन सावंत यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
गांधी जयंतीनिमित्त सुट्टी असताना ट्रॅफिक जामचं कारण देत पोलिसांनी दडपशाही केली असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. गांधीजींचा विचार असा संपवता येणार नाही. एके ठिकाणी गोडसेचा उदोउदो करणाऱ्यांना खुली सूट आणि गांधीजींच्या मार्गावर चालणाऱ्यांना अशी वागणूक… याचा आम्ही जाहीर निषेध करतो' असं सावंत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून पोलीस कारवाई: ‘आप’चा आरोप
राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी कारवाई केली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी केला आहे. पोलीसांच्या हिंसेनंतरसुद्धा आपच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रा पूर्ण केली असल्याचा दावा मेनन यांनी केला.