MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळण्याची शक्यता; विरोधकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
Feb 23, 2023, 04:03 PM IST
Opposition on MPSC Student Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं राज्यातील सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे.
Opposition on MPSC Student Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं राज्यातील सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे.
Opposition on MPSC Student Protest : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यानं राज्यातील सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं आहे.
Opposition on MPSC Student Protest : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आणलेला अभ्यासक्रम याच वर्षी लागू करण्याच्या आयोगाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. दिवसरात्र विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्यामुळं राज्य सरकार विरोधकांच्या रडारवर आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारनं विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, असा इशारा काँग्रेसनं दिला आहे.
पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं होतं. आता काँग्रेसही आक्रमक झाली असून राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
'विद्यार्थ्यांना लेखी आश्वासन देऊनही सरकारनं अद्याप नोटीफिकेशन काढलेलं नाही. शिंदे फडणीस सरकार व एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत आहे. तीन दिवसांपासून विद्यार्थी पुण्यात बेमुदत आंदोलन करत आहेत, परंतु राज्य सरकार त्याकडं गांभीर्यानं पाहत नाही, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
'MPSC च्या अभ्यासक्रमात केलेल्या बदलाचं विद्यार्थ्यांनी स्वागतच केलं आहे, पण त्याची अंमलबजावणी २०२५ पासून करावी एवढीच त्यांची मागणी आहे. बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी करण्यास वेळ मिळावा इतकंच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि ते रास्त आहे. यासंदर्भात अनेक बैठका झाल्या. राज्य सरकारनंही एमपीएससीला तशा सूचना दिल्या परंतु एमपीएससी अद्याप नोटीफिकेशन काढत नाही. त्यामुळं संभ्रम वाढला आहे, याकडं लोंढे यांनी लक्ष वेधलं.
'एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी याआधीही पुण्यात आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा तर सरकारच्या सूचनेचं पालन करण्यास आयोगातून कोण विरोध करत आहे का? अभ्यासक्रम २०२५ पासून सुरू करण्यास कोण आडकाठी करत आहे? तो झारीतील शुक्राचार्य कोण आहे? याचा शोध घ्यावा, अशी मागणी लोंढे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांना काही झाल्यास गंभीर परिणाम होतील!
'एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे म्हणून शिंदे-फडणवीस सरकार जबाबदारी टाळू शकत नाही. सरकारनं सर्व मार्गांचा अवलंब करून तात्काळ नोटिफिकेशन काढण्यास एमपीएससीला भाग पाडलं पाहिजे. बेमुदत उपोषणावर असलेल्यांपैकी गुरुवारी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालवाली आहे, विद्यार्थ्यांना काही झालं तर होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार व एमपीएससीच जबाबदार असेल, असंही लोंढे म्हणाले.