Washim Crime News : बांधावरून वाद झाला अन् शेजाऱ्याला संपवलं, धक्कादायक घटनेने विदर्भ हादरला
Oct 12, 2023, 11:36 AM IST
- Washim Crime News : संपत्तीच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीला कायमचं संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Washim Crime News : संपत्तीच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीला कायमचं संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Washim Crime News : संपत्तीच्या वादातून आरोपीने एका व्यक्तीला कायमचं संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Washim Crime News Marathi : एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना ताजी असतानाच आता विदर्भातील वाशीम जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमीनीच्या वादातून नातेवाईकांने आपल्याच नात्यातील एका व्यक्तीची निर्घृण हत्या केली आहे. वाशीम जिल्ह्यातील एरंडा गावात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. गजानन सपाटे असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा काही दिवसांपूर्वीच आरोपीशी शेतजमीनीवरून वाद झाला होता. गावातील मंदिर परिसरात बसलेल्या तरुणावर आरोपीने रॉडने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केलं. परंतु उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशीम जिल्ह्यातील एरंडा गावातील काही लोकांमध्ये शेतजमीनीच्या बांधावरून वाद झाला होता. गावातील काही लोकांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. परंतु सूडाने पेटलेल्या आरोपीने गजाननचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. गजानन सपाटे हे गावातील मंदिरात बसलेले असतानाच आरोपी लोखंडी रॉड आणि धारदार शस्र घेवून तिथं आला. यावेळी काही बोलायच्या आत आरोपीने गजानन यांच्यावर जीवघेणा हल्ला सुरू केला. मारहाणीचा आवाज ऐकून स्थानिकांनी तातडीने मंदिर परिसरात धाव घेतली. त्यानंतर जखमी गजानन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
शेतीच्या वादातून ही घटना घडली असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी नीलिमा आरज यांनी दिली आहे. तसेच आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आरोपी गावातला रहिवासी असून त्याला लवकरात लवकर अटक केली जाणार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यातच वाशीम जिल्ह्यात एका महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता शेतीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.