Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा नारायण राणेंना शेवटचा इशारा; म्हणाले, एवढी वेळ सुट्टी देतोय!
Feb 16, 2024, 03:12 PM IST
ManoJ Jarange Patil Vs Narayan Rane : नारायण राणे यांनी शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं.
ManoJ Jarange Patil Vs Narayan Rane : नारायण राणे यांनी शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं.
ManoJ Jarange Patil Vs Narayan Rane : नारायण राणे यांनी शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं.
ManoJ Jarange Patil Vs Narayan Rane : 'मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या शब्दात टीका करून त्यांची खिल्ली उडवणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जरांगे पाटील यांनी आज निर्वाणीचा इशारा दिला. ‘आजवर पाचवेळा तुम्हाला आम्ही सहन केलंय. आज आणखी एक वेळ सुट्टी देतो. पण यापुढं काही बोललात तर सोडणार नाही. धुवून काढीन,’ असं जरांगे पाटलांनी सुनावलं.
मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी लढा उभारला आहे. गेल्या काही महिन्यात ते तिसऱ्यांदा उपोषण करत आहेत. राज्य सरकार वेळकाढूपणा करत असल्याची भावना झाल्यानं दोन दिवसांपूर्वी त्यांनी सरकारला इशारा दिला होता. नरेंद्र मोदी यांच्या सभा महाराष्ट्रात होऊ देणार नाही असं ते म्हणाले होते.
जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर राणेंंनी त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. जरांगेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी त्याला मराठा मानतच नाही. जरांगे पाटलानं औकात ओळखून पडून राहावं, असं राणे म्हणाले होते. राणेंच्या या टीकेला जरांगे पाटलांनी आज पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.
मोदींना ओबीसी असल्याचा अभिमान आहे आणि तुम्ही मराठ्यांना विरोध करता?
'नरेंद्र मोदींना स्वत:ला ओबीसी असल्याचा अभिमान आहे. अनेक वेळा ते भाषणात बोललेत. तुम्हाला मराठा असल्याचा स्वाभिमान नाही का? तुम्ही तर मराठा, मराठा म्हणून छाती बडवता. मग आम्ही मराठ्यांसाठीच लढतोय. तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही स्वाभिमानानं आमच्या बाजूनं लढायला पाहिजे, असं जरांगे पाटील राणेंना उद्देशून म्हणाले.
कुठून हवा निघेल ते कळेल!
‘आम्ही तिसऱ्याला बोललो की तुम्ही मध्ये का बोलता? तुम्ही कशाला री ओढता? तुम्ही काय ठेका घेतला का?,’ असा सवाल जरांगे यांनी केला. उपोषणाची खिल्ली उडवणाऱ्या राणेंना त्यांनी थेट आव्हान दिलं. 'चारच दिवस उपोषण करा, कुठून कुठून हवा निघेल ते कळेल, असा खोचक टोला जरांगे पाटलांनी हाणला.
मुलांनी नारायण राणेंना समजवावं!
‘नारायण राणे हे किंमतीचे नेते आहेत. मी त्यांना मानत होतो, मानतो म्हणून आजवर काही बोललो नाही. त्यांच्या वयाचा आदर करतो. माझ्या तोंडातून एखादा शब्द जाऊन त्यांना डाग लागू नये असं मला वाटतं. माझी भावना समजून घ्या. नाहीतर मी पुरा पाणउतारा करेन. सोडणार नाही. पाच वेळा आम्ही सांगितलंय, पण त्यांना काही दम निघत नाही. आता माझी ऐकून घेण्याची क्षमता संपलीय. आता पुन्हा बोलले की सोडणार नाही. ज्याला कुणाला खेटायचं असेल त्याला खेटायची तयारी आहे, असं जरांगे पाटील म्हणाले. ‘नारायण राणे यांना मी एका शब्दानंही अजून बोललेलो नाही. त्यांच्या मुलांनी त्यांना समजावून सांगावं. आम्हालाही मर्यादा आहेत. नाहीतर कचाट्यात सापडला की धुवून काढीन,’ असं त्यांनी सुनावलं.