Shinde Group : शिंदे गटात धुसफूस! मंत्रिपद नसल्यानं आमदार नाराज अन् ‘हे’ दोन मंत्री बंडाच्या तयारीत
Jan 03, 2023, 09:50 AM IST
- Conflict In Shinde Group MLAs : आपल्याच पक्षातील आमदार मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा लीक करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
Conflict In Shinde Group MLAs : आपल्याच पक्षातील आमदार मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा लीक करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
- Conflict In Shinde Group MLAs : आपल्याच पक्षातील आमदार मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा लीक करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी केला आहे. त्यामुळं आता शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे.
Conflict In Shinde Group MLAs : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपच्या पाठिंब्यानं राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाचे अनेक नेते मंत्री झाले. परंतु मंत्रिपदासाठी शिंदे गटातील इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं आता ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण आता मंत्रिपद न मिळालेल्या आमदारांमध्ये आणि चांगलं खातं न मिळालेल्या मंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत थेट माध्यमांसमोरच खुलासा केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेली चर्चा आमच्याच पक्षातील काही आमदार लीक करत असल्याचा गौप्यस्फोट कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. याशिवाय टीईटी घोटाळा आणि वाशिममधील गायरान जमीन खरेदी व्यवहाराची माहिती शिंदे गटाच्याच नेत्यांनी विरोधकांकडे पोहचवल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं अस्वस्थ झालेल्या सत्तारांनी माध्यमांशी बोलताना नाव न घेता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना टोला हाणला आहे. अब्दुल सत्तारांमुळं मंत्रिपद गेल्याची भावना संजय शिरसाटांच्या समर्थकांमध्ये आहे. याशिवाय त्यांनी याआधी सामाजिक न्यायमंत्री होणार असल्याची औरंगाबादेत घोषणा केली होती. परंतु सत्तांतर झाल्यानंतरही आमदार संजय शिरसाट, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, बच्चू कडू, शहाजीबापू पाटील, महेश शिंदे, सुहास कांदे आणि अशा अनेक इच्छुक आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्यानं ते नाराज असल्यानं एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर...
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात जळगावात व्यासपीठावरून वाद झाला होता. त्यावेळी सत्तारांनी सर्वांसमोर गुलाबराव पाटलांवर टीका केली होती. याशिवाय तानाजी सावंत आणि दीपक केसरकर या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळं शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय संदीपान भुमरेंना औरंगाबादचं पालकमंत्री करण्यात आल्यामुळंही अन्य नेते नाराज असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काही मंत्र्यांना पसंतीचे खाते न मिळाल्यानं ते एकमेकांवर मोजक्या शब्दात नाव न घेता टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटलांनी शिवसेनेत परण्याचे संकेत दिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
शिंदे गटातील ६० टक्के आमदार भाजपमध्ये जातील- राऊत
आमदारांची आणि मंत्र्यांची नाराजी पाहता शिंदे गटातील अर्ध्याहून अधिक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आणि अनिल परब यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या नेत्यांनी यावर आक्रमक प्रतिक्रिया दिल्या तर भाजप नेत्यांनी मौन पाळलं. त्यामुळं आता शिंदे गटात अंतर्गत नाराजी वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.