Congress Maharally : है तय्यार हम! नागपूर शहरात उद्या वाजणार कॉंग्रेसच्या लोकसभा प्रचाराचं बिगूल
Dec 27, 2023, 07:29 PM IST
- नागपुरात तब्बल ४० एकर क्षेत्रावर पसरलेल्या आझाद मैदानावर कॉंग्रेसच्या जंगी महारॅलीची जय्यत तय्यारी झाली असून व्यासपीठावर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका या तीन गांधींची अभूतपूर्व उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
नागपुरात तब्बल ४० एकर क्षेत्रावर पसरलेल्या आझाद मैदानावर कॉंग्रेसच्या जंगी महारॅलीची जय्यत तय्यारी झाली असून व्यासपीठावर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका या तीन गांधींची अभूतपूर्व उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
- नागपुरात तब्बल ४० एकर क्षेत्रावर पसरलेल्या आझाद मैदानावर कॉंग्रेसच्या जंगी महारॅलीची जय्यत तय्यारी झाली असून व्यासपीठावर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका या तीन गांधींची अभूतपूर्व उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी, उद्या २८ डिसेंबर रोजी नागपूर शहरात कॉंग्रेसकडून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. नागपुरात तब्बल ४० एकर क्षेत्रावर पसरलेल्या आझाद मैदानावर होणाऱ्या या जंगी महारॅलीची जय्यत तय्यारी झाली असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह देशभरातील कॉंग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, ३०० प्रमुख वरिष्ठ राजकीय नेते, कॉंग्रेसचे खासदार आणि देशभरातील ३०० कॉंग्रेस आमदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचा हा महामेळावा हे महाराष्ट्रासाठी ही एक ऐतिहासिक घटना असल्याचं मानलं जात आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आपली ताकद दाखवून देण्याच्या हेतुने या महारॅलीला नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमधून सुमारे दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नागपूर शहराजवळील दिघोरी नाका परिसरात आयोजित या सभास्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले असून ‘है तैयार हम’ हे सभेचं घोषवाक्य ठरले आहे.
भाजपची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपूर हे मुख्यालय आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या महारॅलीसाठी जाणीवपूर्वक नागपूर शहराची निवड करण्यात आल्याचं बोललं जात आहे. शिवाय भौगोलिकदृष्ट्या नागपूरचं स्थान हे भारताच्या केंद्रस्थानी असल्यामुळे केंद्रातील भगव्या सरकारला आव्हान देत लोकसभा निवडणूक मोहिमेची सुरुवात करण्याचा यामागे उद्देश असल्याचं बोललं जात आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे राज्यातील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते गेले काही दिवस नागपुरात तळ ठोकून असून कार्यक्रमाच्या तयारीवर लक्ष ठेवून आहे. संघाच्या मैदानात भाजपला जोरदार प्रत्युत्तर देऊ असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
नागपूर हे देशातील अनेक चळवळी आणि क्रांतीचे केंद्रस्थान असल्याने नागपूरचे ऐतिहासिक महत्त्व असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. १९२० साली नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसने ब्रिटिश राजवटीविरुद्ध असहकार आंदोलनाचा ठराव केला होता. परिणामी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, या ऐतिहासिक संदर्भासोबतच १९५९च्या नागपूर येथे आयोजित कॉंग्रेस अधिवेशनात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यामुळे नागपूर शहरात उद्या, १३९ वा स्थापना दिवस साजरा होतोय, हे अभिमानास्पद असल्याचं नाना पटोले म्हणाले. सद्यस्थिती तशीच असल्याचे ते म्हणाले. फक्त यावेळी देशावर सत्ता गाजवणाऱ्या भगव्या आघाडी विरोधात रणशिंग फुंकले जाणार असल्याचे पटोले म्हणाले.
नागपूर शहरात आयोजित या महारॅलीमध्ये व्यासपीठावर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका या तीन गांधींची अभूतपूर्व उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे.