नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा; विदर्भातील डझनभर नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी
Feb 24, 2023, 03:26 PM IST
- Nana Patole : पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या अधिवेशनात नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
Nana Patole : पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या अधिवेशनात नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
- Nana Patole : पदवीधर निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर आता काँग्रेसच्या अधिवेशनात नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
maharashtra congress : नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यावरून सुरू झालेला वाद शमलेला असतानाच आता विदर्भातील नेत्यांनी नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भातील काँग्रेसच्या तब्बल २४ नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली असून शिवाजीराव मोघे यांच्या प्रदेशाध्यपदाची धुरा देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं आता पदवीधर निवडणुकीवेळी झालेल्या राड्यानंतर अद्यापही काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीवेळी काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद समोर आल्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची काँग्रेस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर चेन्निथला यांनी मुंबईत येऊन काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली, त्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीत काँग्रेस समितीचे सचिव रहमान खान नायडू, सदस्य प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुगदीया, इक्राम हुसैन, सरदार महेंद्र सिंह सलूजा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. विदर्भातील या नेत्यांनी नाना पटोलेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांमधील मतभेदांचे पडसाद काँग्रेसच्या रायपुरमधील अधिवेशनातही उमटणार असल्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसनं सत्यजीत तांबे यांना उमेदवारी न देता सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळं ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच काँग्रेस नेत्यांमध्ये संघर्ष उफाळून आला होता. निवडणूक पार पडल्यानंतर तांबे आणि थोरात कुटुंबियांना काँग्रेसबाहेर ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट सत्यजीत तांबे यांनी केला होता. याशिवाय बाळासाहेब थोरात यांनीदेखील नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यासोबत काम करणं अशक्य असल्याचं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एचके पाटील यांना सांगितलं होतं. त्यामुळं आता महाराष्ट्र काँग्रेसमधील वादावर काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.