औरंगाबाद लोकसभेला कोणताही उमेदवार द्या, निवडून आणू; भुमरेंचा CM शिंदेंना शब्द!
Jul 18, 2022, 04:43 PM IST
- MLA Sandipan Bhumre : मी वॉचमन होतो, पण गेल्या ४० वर्षात पैठण विधानसभा मतदारसंघात कधीही भगवा खाली येऊ दिला नाही, असं माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
MLA Sandipan Bhumre : मी वॉचमन होतो, पण गेल्या ४० वर्षात पैठण विधानसभा मतदारसंघात कधीही भगवा खाली येऊ दिला नाही, असं माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
- MLA Sandipan Bhumre : मी वॉचमन होतो, पण गेल्या ४० वर्षात पैठण विधानसभा मतदारसंघात कधीही भगवा खाली येऊ दिला नाही, असं माजी मंत्री आणि शिंदेगटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
MLA Sandipan Bhumre And CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपद मिळवल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांचा चांगलाच विश्वास वाढला आहे. शिंदे यांना ४० आमदार आणि काही खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर आता स्थानिक पातळीवरील अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले आमदार संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार हे देखील उपस्थित होते.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संदीपान भुमरे यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होत आहे. 'शिंदे साहेब, तुम्ही औरंगाबाद लोकसभेसाठी कोणताही उमेदवार द्या, त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही तिघे (आमदार शिरसाट, भुमरे आणि अब्दुल सत्तार) नेटानं प्रयत्न करू', इतकंच नाही तर औरंगाबाद महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा कोणत्याही स्वरुपाच्या निवडणुकीत बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेसाहेबांचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दच भुमरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे.
एकीकडं शिवसेनेतील नेते बंड केलेल्या आमदारांपैकी कुणीही निवडून येणार नसल्याचं सांगत असतानाच आता भुमरेंनी शिंदेंना दिलेल्या शब्दाची चर्चा राज्यभर होत आहे. याशिवाय शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्यूत्तर देताना शिंदेंनी माझ्यासोबत आलेल्या ४० आमदारांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं आता शिंदेगटाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांनी लोकसभेच्या जागेवर दावा सांगायला सुरुवात केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार उरलेली अडीच वर्ष टिकलं तर २०२४ मध्ये औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध शिंदेसेना असा उभा संघर्ष पाहायला मिळू शकतो. औरंगाबाद लोकसभा जिंकण्याचा दावा करताना भुमरे यांनी शिवसेना नेते संजय राऊतांच्या वॉचमन म्हणून केलेल्या टीकेलाही प्रत्यूत्तर दिलं आहे. मी वॉचमन होतो, पण गेल्या ४० वर्षात पैठण मतदारसंघात कधीही भगवा खाली येऊ दिला नाही, असं प्रत्यूत्तर भुमरे यांनी राऊतांना दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेली हिंदुत्त्वाची भूमिका बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पटलेली आहे. त्यामुळंच आज अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा देत आहेत, त्यामुळं भविष्यात शिंदे यांची सेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना म्हणून ओळखली जाणार असल्याचाही दावा शिंदेगटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी केला आहे.
सद्यस्थिती काय आहे?
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे होते. MIM कडून इम्तियाज जलील तर अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव रिंगणात होते. या तिरंगी लढतीत इम्तियाज जलील यांनी बाजी मारली होती. मतांच्या वाटणीमुळं शिवसेनेचा उमेदवार पडल्याचा दावा त्यावेळी अनेक शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. याशिवाय हर्षवर्धन जाधव हे देखील लोकसभा निवडणुक लढण्याआधी कन्नडमधून शिवसेनेचे आमदार होते. त्यामुळं गेल्या लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित बदलेलं होतं.
औरंगाबाद जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आता शिवसेनेतून शिंदेगटाच्या बंडखोरीमुळं जिल्ह्यातील राजकीय चक्र पुन्हा बदललेलं आहे. कारण जिल्ह्यातील सहापैकी तब्बल पाच आमदारांनी शिंदेंसोबत शिवसेनेत बंडखोरी केली होती. त्यामुळं आता आमदार भुमरेंचा दावा खरा ठरणार की औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राहणार हे २०२४ च्या निवडणुकीनंतरच कळेल.