Mumbai Gandhi Yatra : गांधी यात्रेला गालबोट, कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये राडा, आमदारांना अटक, मुंबईत काय घडतंय?
Oct 02, 2023, 04:37 PM IST
- Mumbai Gandhi Yatra : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गांधी यात्रा काढली होती. त्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Gandhi Yatra : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गांधी यात्रा काढली होती. त्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Mumbai Gandhi Yatra : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी गांधी यात्रा काढली होती. त्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Gandhi Yatra Mumbai News Today : महाराष्ट्रासह देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती साजरी केली जात आहे. अनेकांनी बापुंना आदरांजली अर्पण करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. चोहीकडे गांधीमय वातावरण निर्माण होत असतानाच आता आर्थिक राजधानी मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिया आघाडीच्या वतीने मुंबईत काढण्यात आलेल्या गांधी शांती यात्रेला गालबोट लागलं आहे. इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि मुंबई पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी झाली असून काही लोकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया आघाडीच्या वतीनं मुंबईत गांधी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची यात्रा मुंबईतल्या फॅशन स्ट्रीटजवळ येताच पोलिसांनी यात्रेला अडवलं. यावेळी पोलीस आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली असून काही लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदार अबु आझमी यांना ताब्यात घेतलं असून काँग्रेस, समाजवादी पार्टी, आप आणि कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांची मुंबई पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. फॅशन, स्ट्रीटजवळ लावण्यात आलेले बॅरिकेट्स आंदोलकांनी तोडून टाकले. यावरूनच पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे.
इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते फॅशन स्ट्रीटजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमा ते महात्मा गांधी पुतळा अशी पदयात्रा काढण्याचं नियोजन इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलं होतं. त्यासाठी संबंधित नेत्यांनी आंदोलनाची परवानगी देखील मागितली होती. परंतु आंदोलनाची जागा ही शांतता क्षेत्र घोषित करण्यात आलेली असल्याने पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती. परंतु तरीदेखील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पदयात्रा काढल्याने मोठा राडा झाला आहे. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, माजी खासदार संजय निरुपम आणि आमदार अबु आझमी हे या आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती आहे.