Haris Rauf: विराटनं धू धू धुतलं… पाकिस्तानचा बॉलर म्हणतो, अजिबात दु:ख नाही!
Dec 01, 2022, 12:49 PM IST
Haris Rauf on Virat Kohli: टी-२० विश्वचषकात विराट कोहलीनं मारलेले षटकार पाकिस्तानी गोलंदाज हारीस रौफ अद्याप विसरलेला नाही.
Haris Rauf on Virat Kohli: टी-२० विश्वचषकात विराट कोहलीनं मारलेले षटकार पाकिस्तानी गोलंदाज हारीस रौफ अद्याप विसरलेला नाही.
Haris Rauf on Virat Kohli: टी-२० विश्वचषकात विराट कोहलीनं मारलेले षटकार पाकिस्तानी गोलंदाज हारीस रौफ अद्याप विसरलेला नाही.
Haris Rauf praises Virat Kohli: टी-२० विश्वचषकाच्या फायनलपर्यंत मजल मारणं भारतीय संघाला जमलं नसलं तरी यातील काही अटीतटीचे सामने भारतीय प्रेक्षकांना आनंद देऊन गेले. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला गवसलेला फॉर्म आणि त्यानं केलेली जबरदस्त फलंदाजी क्रिकेटरसिकांना सुखावणारी ठरली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं केलेली झंझावाती खेळी भारतीय क्रीडाप्रेमीच नव्हे तर पाकिस्तानी गोलंदाजही विसरू शकलेले नाहीत. पाकिस्तानचा गोलंदाज हारीस रौफ यानं स्वत:च ही कबुली दिली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं ५३ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली होती. यात सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. या खेळीतील दोन अप्रतिम षटकार विराटनं हारीस रौफ यांच्या गोलंदाजीवर मारले होते. विराटचे ते 'तडाखे' हारीस रौफ अजूनही विसरू शकलेला नाही. 'क्रिकवीक'ला दिलेल्या मुलाखतीत हारीस या सामन्याबद्दल भरभरून बोलला. विराटनं मारलेल्या षटकारांचं मला दु:खही वाटत नाही, असंही तो म्हणाला.
हारीस रौफच्या एका चेंडूवर विराटनं ठोकलेल्या षटकारानं क्रिकेटप्रेमींबरोबरच खुद्द हारीसलाही बुचकळ्यात टाकलं होतं. 'विश्वचषकात विराट ज्या पद्धतीनं खेळला, तोच त्याचा खरा दर्जा आहे. मैदानात तो कसा चौफेर फटकेबाजी करतो हे सर्वांनाच माहीत आहे. ज्या प्रकारे त्यानं माझ्या चेंडूवर षटकार मारले, तसे कोणी मारू शकेल असं मला वाटत नाही. हार्दिक पंड्या किंवा दिनेश कार्तिकनं हेच फटके मारले असते तर मला वाईट वाटलं असतं. पण, हे फटके विराटच्या बॅटमधून आले होते, त्यामुळं दु:ख वाटत नाही. तो त्याचा 'क्लास' आहे,' असं रौफ म्हणाला.
सामन्याबद्दल बोलताना रौफ म्हणाला, ‘भारताला शेवटच्या १२ चेंडूंत ३१ धावांची गरज होती. मी चार चेंडूत फक्त तीन धावा दिल्या होत्या. शेवटची ओवर नवाज टाकणार हे मला माहीत होतं. तो स्पिनर असल्यामुळं माझ्या ओवरमध्ये कमीत कमी धावा देण्याचा माझा प्रयत्न होता. शेवटच्या ओवरसाठी किमान २० धावा राहतील असं मला वाटलं होतं. आठ चेंडूत २८ धावा हव्या असल्यानं मी तीन चेंडू स्लो टाकले. त्यावर फलंदाज फसले. चार पैकी फक्त एकच चेंडू फास्ट टाकला. विराट इतक्या लांबून तो चेंडू फटकावेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. माझी प्लानिंग आणि अंमलबजावणीही परफेक्ट होती, पण विराटचा तो फटका दर्जेदार होता.’