IND vs WI: हार्दिक पांड्या स्वार्थी आहे, सोशल मीडियावर चाहत्यांची संतापजनक प्रतिक्रिया; वाचा कारण
Aug 09, 2023, 02:41 PM IST
Hardik Pandya Trolled: भारताच्या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Hardik Pandya Trolled: भारताच्या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Hardik Pandya Trolled: भारताच्या विजयानंतरही कर्णधार हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
Hardik Pandya News: वेस्ट इंडीजविरुद्ध काल (०८ ऑगस्ट २०२३) खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाने मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले. गयाना येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघाने भारतासमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले, जे सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताने हा सामना १७.५ षटकांत जिंकला. मात्र, या सामन्यातील विजयानंतरही भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. हार्दिक पांड्या हा स्वार्थी खेळाडू असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. यामागचे कारण जाणून घेऊयात.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याने तिलक वर्माला त्याचे अर्धशतक पूर्ण करू न दिल्याने तो चाहत्यांच्या रोषाचा बळी ठरत आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ८३ धावांची शानदार खेळी केली. भारताला सामना जिंकण्यासाठी फक्त २ धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पंड्या स्ट्राइकवर होता. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला तिलक वर्मा ४९ धावांवर नाबाद होता. मात्र, हार्दिक पांड्याने तिलक वर्माला स्ट्राईक न देता रोव्हमन पॉवेलच्या चेंडूवर षटकार ठोकला. या षटकारासह भारताला विजय मिळाला, पण तिलक वर्माचे एका धावाने अर्धशतक हुकले. चाहत्यांचे मते, भारतीय संघाकडे बरेच चेंडू शिल्लक होते. हार्दिक पांड्याने तिलक वर्माला स्ट्राईक द्यायची होती, असे चाहत्यांचे म्हणणे होते. जिथे, षटकाराची काहीच आवश्यकता नसतानाही हार्दिक पांड्याने षटकार ठोकला. हार्दिकच्या या कृतीबद्दल चाहते सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत.
तिसऱ्या आणि महत्त्वाच्या टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. या सामन्यात कुलदीपने वेस्ट इंडीजच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले. तर, अक्षर पटेलच्या खात्यात एक विकेट जमा झाली. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वेस्ट इंडीजच्या संघाला २० षटकात १५९ पर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारताने हा सामना ७ विकेट्सने जिंकला.