Uddhav Thackeray: ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, उद्धव ठाकरेंची जोरदार टोलेबाजी
Jun 08, 2022, 09:36 PMIST
औरंगाबादमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत उद्धव यांच्या ठाकरी बाणांनी विरोधकांना चांगलेच घायाळ केले. या सभेमध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
निवडणुका आल्या की धर्माची अफूची गोळी द्यायची ही भाजपाची थेरं : उद्धव ठाकरे
अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत : उद्धव ठाकरे
तो पाण्यासाठी आक्रोश मोर्चा नव्हता, तर सत्ता गेल्यामुळे होता - ठाकरे
मध्ये कुणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. तो आक्रोश संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली त्याच्यासाठी होता. पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्याआधी पाच वर्ष तुम्हीच होता. आम्ही तुमच्यासोबत होतो. का नाही केलं काम?
डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
भाजपाने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही. आमचा संयम सुटला तर तेही करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावला जात असेल तर ते आम्हाला मान्य नाही.
औरंगाबादचे नामांतर आता संभाजीनगर करतो, पण.. उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील
.. तर ठेकेदारांना तुरुंगात टाकणार : उद्धव ठाकरे
मी पहिल्यांदा औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहे. मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते : उद्धव ठाकरे
ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. त्यामुळे मला या सैनिकांची शक्तीही तिकडे वाया घालवायची नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सहा महिन्यांनी मुंबईबाहेर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलो आहे. सर्वात अगोदर बाळासाहेबांचे प्रिय शहर संभाजीनगरामध्ये आलो आहे.
तर भाजपाच्या नामर्द लोकांनी काश्मीरमध्ये जावं - संजय राऊत
आक्रोश पाहायचा असेल तर भाजपाच्या नामर्द लोकांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आक्रोश पाहावा. रोज अतिरेक्यांचे हिंदूंवर भ्याड हल्ले होत आहेत. मागील २ महिन्यात काश्मीरमध्ये २७ काश्मिरी पंडीत, हिंदूंची घरात घुसून हत्या झाली आणि सरकार नामर्दासारखं हातावर हात ठेवून बसलंय : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
उद्धव ठाकरे यांचं सभेच्या मंचावर आगमन, संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेत्यांकडून जोरदार घोषणाबाजी
..तर भाजपा पाणी मागायला देखील उठणार नाही : संजय राऊत
औरंगाबादमधील जनसमुदायाच्या लाटांचा फटका भाजपाला बसला तर पाणी मागायला देखील उठणार नाही. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी उठलेली जनतेची ही लाट दिल्लीला देखील झटका देईल. महाराष्ट्र कुणाचा हे सांगणारी ही सभा आहे. काहींनी याच मैदानात सभा घेऊन आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, असा टोला संजय राऊत यांनी हाणला.
संभाजीनगरचा चेहरामोहरा बदलणार, येथेही मेट्रो आणणार : सुभाष देसाई
संभाजीनगरमध्ये देखील मेट्रो आणणार आहे. या शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. आता शहरीकरण आधुनिक असावं यासाठी आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी नेमणार आहे. ते नव्या संभाजीनगरचा आराखडा सादर करेल. सुपर संभाजीनगरचं स्वप्न साकारण्यासाठी जनतेने साथ द्यावी : सुभाष देसाई
उद्धव ठाकरेंकडून औरंगाबाद शहरासाठी १,६८० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर - सुभाष देसाई
औरंगाबादमधील पाणी पातळी वाढली आहे. शहरासाठी उद्धव ठाकरे यांनी १,६८० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करत शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. पाणी योजना वेळेत पूर्ण करून पाणी प्रश्न सोडवला नाही, तर ठेकेदाराला तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे. राणेंना ज्यांनी सोडलं नाही, तर या ठेकेदारांना काय सोडणार? असा सवाल सुभाष देसाई यांनी केला आहे. दावोसमध्ये झालेल्या करारात अनेक कंपन्या महाराष्ट्रात दाखल होत असून त्यातील काही मराठवाड्यात सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार का?
मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या ३७व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वीपासूनच औरंगाबादच्या नामांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. तसेच, आजच्या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची अधिकृत घोषणा करणार असल्याचं बोलले जात आहे.
किरीट सोमय्यांनी संभाजीनगरला यावे, थोबाड फोडले जाईल - खैरे
पाच वर्षे भाजपची सत्ता असताना त्यांनी औरंगाबादसाठी काय केलं? भाजपकडून फक्त शिसेनेला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. किरीट सोमय्या शिवसेना व उद्धव ठाकरेंवर खालत्या पातळीतील टीका करत आहे, त्यांनी संभाजीनगरला यावे, त्यांचे थोबाड फोडले जाईल, असा इशारा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे.
रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध मला करू द्या - अब्दुल सत्तार
अर्जून खोतकर आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना एक विनंती आहे की, लोकसभा निवडणुकीत एकदा अर्जून बाणाने रावसाहेब दानवे यांचा राजकीय वध करू द्या. एक संधी द्या. त्या संधीचं सोनं केलं नाही, तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही : अब्दुल सत्तार
भाजपाचं हिंदुत्व बेगडी आहे : अर्जून खोतकर
भाजपाचं हिंदुत्व खुर्चीचं आहे, बेगडी आहे. लोकांना सांगतात आपल्या राज्यात हनुमान चालिसा वाचायला बंदी आहे. किती खोटं बोलावयचं. मी दररोज दोनदा हनुमान चालिसा वाचतो. राज्यात आणि देशात हनुमान चालिसावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला : अर्जून खोतकर