Marathi News 3 August 2022 Live: 'नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच'
Aug 03, 2022, 06:21 PMIST
Marathi News Live Updates: राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.
CWG Boxing: निखत झरीन सेमी फायनलमध्ये, भारताचे पदक निश्चित
वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सर निखत जरीनने राष्ट्रकुल स्पर्धेत स्वत:चे आणि भारताचे पदक निश्चित केले आहे. तिने ४८-५०किलो (लाइट फ्लाय) गटात उपांत्य फेरी गाठली आहे. निखतने वेल्सच्या हेलन जोन्सचा पराभव केला. तिने हा सामना ५-० असा जिंकला.
Two boy drown : नागपुरातील दोन तरुण कन्हान नदीत बुडाले
येथून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या मौदा येथील कन्हान नदीत बुधवारी सायंकाळी दोन नागपूरकर तरुणांचा बुडून मृत्यू झाला. मौदा येथे एका खाजगी कार्यक्रमात आल्यानंतर दोघे हे नदीवर पोहायला गेले होते. नदीच्या जोरदार जोरामुळे दोघेही वाहून गेले. राहुल ठोंबरे (२५) आणि त्याचा मित्र उमेश ठाकरे (२७, दोघेही नागपुरातील गोरेवाडा येथील रहिवासी) अशी बुडालेल्या मृत तरुणांची नावे आहेत. मौदाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पथकासह दाखल झाले. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचीही मदत घेतली जात आहे.
नवीन महाविद्यालयांसाठी इरादापत्रांची मुदत १७ ऑगस्ट
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संदर्भातील अध्यादेश निर्गमित करण्यात येईल. या अधिनियमामुळे महाविद्यालयांना नवीन महाविद्यालये, परिसंस्था सुरु करणे तसेच नवीन अभ्यासक्रम, विषय, विद्याशाखा अतिरिक्त तुकड्या किंवा सॅटेलाईट केंद्रे सुरु करण्यासाठी १७ ऑगस्ट २०२२ पूर्वी इरादापत्र देता येईल.
Motar Act : मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंधाची होणार निर्मिती
राज्याच्या मोटार वाहन विभागासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवरील खर्चाचा भारही कमी होणार आहे. विभागासाठी ४३५० पदांच्या सुधारित आकृतीबंधानुसार नवीन ४४३ नियमित पदे निर्मिती करण्यात येतील. यामध्ये सह परिवहन आयुक्त या संवर्गातील ५ नियमित पदांचा देखील समावेश आहे.
व्यापाऱ्यांना जीएसटी विवरण भरणे सोईचे व्हावे म्हणून सुधारणा
व्यापाऱ्यांना वस्तू व सेवा कर विवरण पत्रके भरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा २०१७ आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ यामधील तरतुदींमध्ये एकसुत्रता राखण्यासाठी या सुधारणा करण्यायत आल्या. यामुळे करदाते व वस्तु व सेवाकर विभाग यांच्यामध्ये भविष्यातील अडचणी दूर होतील व कार्यपद्दतीचे सुलभीकरण होईल.
लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी खर्चास सुधारित मान्यता
जव्हार तालुक्यातील मौजे हिरडपाडा येथील लेंडी लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १८७ कोटी ०४ लाख रुपयांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे ५ गावातील ५५० हेक्टर आदिवासी क्षेत्र सिंचित होईल.
Wardha : वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या सुधारित खर्चास मान्यता
यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगांव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या ५६५कोटी ८७ लाख रुपये किंमतीच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पामुळे बाबूळगाव तालुक्यातील ५ हजार ६६३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या रुंदीकरणास मिळणार वेग; ५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित मान्यता
भिवंडी कल्याण शीळ फाटा रस्त्याच्या सहा पदरी रुंदीकरणाला वेग देण्यात येणार असून यातील ५६१ कोटी ८५ लाख रुपयांच्या सुधारित कामांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा प्रकल्प शासनाच्या निधीतून ठेव अंशदान तत्त्वावर राबविण्यात येईल. पत्री रेल्वे उड्डाण पूल, कटई येथील २ रेल्वे उड्डाण पूल व विद्युत वाहिन्या व जल वाहिन्या स्थलांतरीत करणे इत्यादी कामांमुळे कामाच्या स्वरुपात बदल झाल्याने हा खर्च वाढला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला निधी व आतापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास शासनाकडून देण्यात आलेला १०५ कोटीचा निधी वगळून उर्वरित ४५६ कोटी ८५ लाख इतका निधी शासनाच्या निधीतून महामंडळास हस्तांतरित करण्यात येणार आहे.
CWG Boxing : भारताचा मोहम्मद हुसामुद्दीन सेमी फायनलमध्ये, कांस्य पदक निश्चित
बॉक्सिंगमध्ये भारताच्या मोहम्मद हुसामुद्दीनने ५७ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत नामिबियाच्या ट्रायअगेन मॉर्निंग डेव्हेलोचा ४-१ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील विजयासह हुसामुद्दीनचे किमान कांस्यपदक निश्चित आहे.
ZP Election : जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०
जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
सध्या राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये कमीत कमी ५५ आणि जास्तीत जास्त ८५ अशी सदस्य संख्या अशी आहे. ग्रामीण भागातील घटत चाललेल्या लोकसंख्येमुळे सुधारित सदस्य संख्या करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा देण्यात येतील. या संदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल.
CWG Hockey: हॉकीमध्ये भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत
हॉकीमध्ये भारतीय महिला संघाने कॅनडाचा ३-२ असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
CWG 2022 Boxing : नीतू सिंग उपांत्य फेरीत, भारताचं कांस्य पदक निश्चित
नीतू सिंगने महिला बॉक्सिंगच्या ४५-४८ किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. यासह नीतूने किमान आपले कांस्य पदक निश्चित केले आहे. तिने उपांत्यपूर्व फेरीत उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लॉइडचा पराभव केला.
Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil: नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच, उद्धव ठाकरे यांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा
प्रेमानं आणि मायेनं निष्ठेचं दूध पाजलं, पण अवलाद गद्दार ती गद्दारच निघाली. जळगामध्ये भाजपनं गुलाब पाहिलेत, पण आता त्यांना शिवसैनिकांचे काटे पाहायला मिळतील. एक गुलाब गेला तरी दुसरा गुलाब आपल्यासोबत आहेत. नागाला कितीही दूध पाजलं तरी चावायचा तो चावतोच, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर केली.
Sachin Sawant on SC Hearing: शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या वादातील सुनावणीवरून सचिन सावंत यांचा शिंदे सरकारला टोला
सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीतून शिंदे फडणवीस सरकार इतके दिवस झाले तरी मंत्रीमंडळ विस्तार का करत नाही याचे कारण जनतेला कळले असेल, असा टोला महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी हाणला आहे.
CWG 2022: ज्युदोमध्ये तुलिका मान फायनलमध्ये, रौप्य पदक निश्चित
भारतीय जुडोका तुलिका मान (Tulilka Mann) हिने महिलांच्या ७८+ किलो वजनी गटात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सिडनी अँड्र्यूजचा १०-१ असा पराभव केला. त्याचवेळी, याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत मॉरिशसच्या ट्रेसी डरहोनचा पराभव केला होता. या विजयासह तुलिका मान हिने आपले रौप्य पदक निश्चित केले आहे.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
मुंबई: मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी घेतली राज्यपालांची भेट
मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांनी हातांनी रंगवलेला टी - सेट भेट दिला.
Uday Samant Attack : 'भगवे मफलर घालून राष्ट्रवादीनं सामंतांवर हल्ला केला', आमदार पडळकरांचा गंभीर आरोप
Attack on Uday Samant : काल शिंदेगटाचे आमदार उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रजमध्ये हल्ला झाला होता. त्याचा निषेध करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे, भगवे मफलर घालून राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांच्या हल्ला केल्याचा धक्कादायक आरोप पडळकरांनी केला आहे.
Uddhav Thackeray: जळगावच्या शिवसैनिकांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट
जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिकांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपल्याला तीन पातळ्यांवर लढावं लागत आहे. गाफील राहू नका,' असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं.
Govind Pansare Murder Case: कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडं (ATS) सोपवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. हा तपास आतापर्यंत विशेष तपास पथकाकडं (SIT) होता. तो आता एटीएसकडं वर्ग केला जाणार आहे. एसआयटीचे काही अधिकारी एटीएसला तपासात सहकार्य करणार आहेत.
Shiv Sena Vs Eknath Shinde in SC Live: शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या याचिकांवरील पुढील सुनावणी उद्या होणार
शिवसेना व एकनाथ शिंदे गटानं एकमेकांविरोधात केलेल्या याचिकांवरील पुढील सुनावणी उद्या होणार आहे. आज दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आपापल्या अशिलांच्या वतीनं जोरदार युक्तीवाद केले. शिंदे गटाच्या वतीनं अॅड. हरीष साळवे यांनी सादर केलेली कागदपत्रे नव्यानं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळं पुढील सुनावणी उद्या होणार आहे.
Shiv Sena Vs Eknath Shinde in SC Live: नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड नियमानुसारच - महेश जेठमलानी
मागील सरकारनं एक वर्षानंतरही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नव्हती. घटनेनुसार नव्या सरकारनं अध्यक्षांची निवड करणं बंधनकारक होतं. त्यानुसार १५४ विरुद्ध ९९ मतांनी ही निवड झाली. सभागृहानं बहुमतानं घेतलेला निर्णय न्यायालयीन कक्षेत येत नाही. घटनात्मक व कायदेशीरदृ
Shiv Sena Vs Eknath Shinde in SC Live: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळं नवं सरकार आलं - महेश जेठमलानी
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळं नव्या सरकारच्या स्थापनेसाठी आमंत्रण द्यावं लागलं. मुख्यमंत्री जेव्हा बहुमत चाचणीला सामोरं जाण्यास तयार नसतात, त्यावेळी त्यांच्याकडं बहुमत नाही असं मानलं जातं - महेश जेठमलानी
Shiv Sena Vs Eknath Shinde in SC Live: राज्यपाल अनिश्चित काळापर्यंत थांबू शकत नाहीत - तुषार मेहता
आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यपाल संबंधित आमदारांना सरकार स्थापन करण्यासाठी कसे आमंत्रण देऊ शकतात, असा मुद्दा होता. मात्र, राज्यपाल अनिश्चित काळ वाट बघू शकत नाहीत. - तुषार मेहता
SG Mehta for Governor in SC: सॉलिसिटर जनरल तुषार मेहता मांडतायत म्हणणं.
पक्षांतर बंदी कायद्यातील दहाव्या परिशिष्टाचा गैरवापर पक्षांतर्गत लोकशाही संपवण्यासाठ आणि बहुसंख्य सदस्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करण्यासाठी केला जाऊ नये - तुषार मेहता
Harish Salve in SC for Eknath Shinde Camp: अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावर निर्णय न होताच आम्हाला अपात्रतेची नोटीस कशी? - हरीष साळवे
आम्ही पक्ष न सोडता आम्हाला अपात्र घोषित केलं गेलं. मात्र, तसा निर्णय देणाऱ्या उपाध्यक्षांविरोधातच अविश्वासाचा प्रस्ताव आला होता. त्यावर निर्णय झाल्याशिवाय ते आम्हाला अपात्र ठरवू शकत नाहीत, असा आमचा मुद्दा आहे. - हरीष साळवे
Eknath Shinde Vs Shiv Sena in SC: निवडणूक आयोगाकडं का गेलात?; सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल
पक्षांतर्गत संघर्षाचा मुद्दा असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडं का गेलात असा सवाल सरन्यायाधीश रमण यांनी शिंदे गटाचे वकील हरीष साळवे यांना केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळं राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आहेत. त्यामुळं निवडणूक चिन्ह कोणाला मिळावं याचा निर्णय व्हायला हवा, असं साळवे म्हणाले.
Eknath Shinde Vs Shiv Sena in SC: पक्षाचा नेता कोण असावा हाच मूळ मुद्दा आहे - हरीष साळवे
आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्ही पक्षातील नाराज गटाचे सदस्य आहोत. पक्षाचा नेता कोण हाच केवळ प्रश्न आहे. निवडणूक आयोगासमोर असलेले प्रश्न आणि अपात्रतेच्या मुद्द्यांची गल्लत करता कामा नये. निवडणूक आयोगाकडं कोणी काय मागण्या केल्या आहेत त्याचा सदस्यांच्या अपात्रतेशी संबंध नाही. शिवसेनेत पक्षांतर्गत बंड झालं आहे. पक्ष कोणीही सोडलेला नाही. त्यामुळं इथं पक्षांतरबंदी कायदा लागूच होत नाही. मी पक्षाचा सदस्य आहे आणि मला नेतृत्व बदल हवा आहे - हरीष साळवे
Eknath Shinde Vs Shiv Sena in SC: एकनाथ शिंदे गटासाठी हरीष साळवे यांचा युक्तिवाद सुरू
पक्षांतरबंदी कायदा हा पाठिंबा गमावलेल्या नेत्यानं पक्षाच्या सदस्यांना डांबून ठेवण्यासाठी बनवलेलं हत्यार नाही. भारतात आपण राजकीय पक्ष आणि नेत्याची गल्लत करतो. उदाहरणार्थ, मी शिवसेनेचा सदस्य आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री मला भेटत नाहीत. त्यामुळं मुख्यमंत्री बदलायला हवेत असं मला वाटतं. यात पक्षविरोधी काहीच नाही. ही पक्षांतर्गत बाब आहे. बहुतेक सदस्यांना जर नेतृत्व मान्य नसेल तर ते बदलण्याची मागणी ते करू शकतात - हरीष साळवे
AM Singhvi in SC: जो काही निर्णय द्यायचा तो कोर्टानं द्यावा - सिंघवी
नवे सरकार आल्यानंतर निवडून आलेल्या विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतलेली नाही. मात्र, बंडखोरांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेण्यात आली. अध्यक्षांनी बंडखोरांच्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली. त्यांच्या प्रतोदाला मान्यता दिली. त्यामुळं या सगळ्याचा निर्णय न्यायालयात व्हावा अशी आमची मागणी आहे. - सिंघवी
Thackeray Vs Shinde in SC: सत्ता ताब्यात घेणं एवढाच बंडखोरांचा गेमप्लान नाही - सिंघवी
महाराष्ट्राची सत्ता ताब्यात घेणं एवढाच गेमप्लान नाही, तर निवडणूक आयोगाकडून काही आदेश मिळवून त्याला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून घेणं हा देखील यामागचा हेतू आहे. मूळ पक्ष आम्हीच आहोत यावर बंडखोरांना निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब करून घ्यायचं आहे.
AM Singhvi for Uddhav Thackeray in SC: विषारी झाडाची फळं कधी चवदार असू शकत नाहीत - अभिषेक मनु सिंघवी
विलिनीकरण हाच बंडखोर आमदारांपुढं एकमेव पर्याय आहे. दहाव्या परिशिष्टानुसार फुटणारे संख्येनं बहुसंख्य असले तरी ते घटनात्मक पापच आहे. बहुमताच्या आधारावर ते स्वत:ला कायदेशीर म्हणवून घेऊ शकत नाहीत. त्यांची प्रत्येक कृती बेकायदा आहे. पूर्वलक्ष्यीप्रभावाने म्हणजेच २१ जूनपासून ती त्यांची प्रत्येक कृती बेकायदा आहे. विषारी झाडाची फळं कधी चवदार असू शकत नाहीत - सिंघवी
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde in SC: हे आमदार अपात्र ठरले तर आतापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी बेकायदा ठरतील - कपिल सिब्बल
ते अपात्र असतील तर आतापर्यंत झालेली संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, अधिवेशन सगळं काही बेकायदेशीर आहे. सरकार म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय बेकादेशीर आहेत. हा लोकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यावर तातडीनं निर्णयाची अपेक्षा आहे - कपिल सिब्बल
Kapil Sibal in Supreme Court: एकनाथ शिंदे गटाची प्रत्येक कृती कायद्याचं उल्लंघन करणारी - कपिल सिब्बल
एकनाथ शिंदे गटाची प्रत्येक कृती कायद्याचं उल्लंघन करणारी आहे आणि त्यांनी पक्ष सोडल्याचंच यातून सिद्ध होतं. त्यामुळंच त्यांना निवडणूक आयोगाकडं जायचं आहे. पण अपात्र सदस्य निवडणूक आयोगाकडं जाऊच शकत नाहीत. निवडणूक आयोग त्यांच्या बाबतीत काही निर्णय घेऊ शकत नाही - कपिल सिब्बल
Shiv Sena Vs Eknath Shinde in SC Live: असं झालं तर उद्या पक्षांतर घडवून अनेक सरकारं पाडली जातील - सिब्बल
दहाव्या परिशिष्टाचा आधार घेऊन पक्षांतराला प्रोत्साहन दिलं जात आहे. ते मान्य केलं तर उद्या सरकार पाडण्यासाठी घाऊक पक्षांतरं घडवून आणली जातील. पक्षांतराला चिथावणी देऊन त्याला कायद्याचं अधिष्ठान मिळवून देण्याचा दहाव्या परिशिष्टाचा उद्देश आहे का, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.
Kapil Sibal in SC for Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत हे शिंदे गटानं याचिकेतही मान्य केलंय - कपिल सिब्बल
आमच्याकडं बहुमत असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. मात्र, बहुमताला दहाव्या परिशिष्टानं मान्यता दिलेली नाही. कोणत्याही स्वरूपाची फूट हे दहाव्या परिशिष्टाचं उल्लंघन आहे. उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष आहेत हे आजही शिंदे गट मान्य करतो. याचिकेतही त्यांनी ते नमूद केलं आहे. शिंदे गट हा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे. ते बहुमतात आहेत या आधारावर ते पक्षाशी नातं तोडू शकत नाहीत - कपिल सिब्बल
Eknath shinde vs shiv sena in SC Live: आम्ही राजकीय पक्ष अशी घोषणा कुणी परस्पर करू शकत नाही - सिब्बल
व्हिप हा राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील दुवा असतो. एकदा निवडून आल्यावर तुम्हाला राजकीय पक्षाशी सहजासहजी नाळ तोडता येत नाही. व्हिपच्या नियुक्तीमागची कल्पनाच ही आहे. गुवाहाटीमध्ये बसून आम्ही मूळ राजकीय पक्ष आहोत असं तुम्ही म्हणू शकत नाही. राजकीय पक्ष कोणता हे निवडणूक आयोग ठरवतो. तुम्ही परस्पर तशी घोषणा करू शकत नाही - कपिल सिब्बल
SC hearing on Eknath shinde vs shiv sena Live: शिंदे गट मूळ पक्षावर दावा करूच शकत नाही - कपिल सिब्बल
सदस्यांच्या वर्तनावरूनही ते पक्षाचा आदेश मानतात का हे समजू शकते असं कर्नाटक सरकारच्या प्रकरणात न्यायलायनं नमूद केलं आहे. शिंदे गटाच्या प्रकरणात तेच लागू होतं. पक्षाच्या बैठकीसाठी बोलावलं असतं शिंदे गटाचे सदस्य सुरत व गुवाहाटीला गेले. तिथून त्यांनी व्हीप बदलल्याचं विधानसभा उपाध्यक्षांना कळवलं. आम्ही पक्ष सोडल्याचं त्यांनी आपल्या वर्तनातूनच दाखवून दिलं होतं. त्यामुळं मूळ पक्षावर ते दावा करूच शकत नाहीत - कपिल सिब्बल
Kapil Sibal for Shiv Sena: विलिनीकरण हाच शिंदे गटाकडं एकमेव पर्याय आहे - कपिल सिब्बल
एकनाथ शिंदे गटानं एक तर दुसऱ्या राजकीय पक्षात विलीन व्हायला हवं. कायद्यानुसार तोच एक मार्ग त्यांच्याकडं आहे. शिंदे गट हे आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा करत आहेत. तशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडं केली आहे. मात्र, ते अयोग्य आहे. दोन तृतीयांश सदस्य असलेला गट आम्हीच मूळ पक्ष आहोत असा दावा करू शकत नाही. दहावे परिशिष्ट त्यास परवानगी देत नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. मूळ पक्षाची व्याख्याच त्यांनी न्यायालयात वाचून दाखवली
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू
शिवसेना व एकनाथ शिंदे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू केला आहे.
Supreme Court: शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी थोड्या वेळासाठी थांबली
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं थोड्या वेळासाठी थांबवली आहे.
येस बँक-डीएचएफल घोटाळा: ईडीकडून १८२७ कोटींची मालमत्ता सील
येस बँक-डीएचएफएल घोटाळ्याच्या प्रकरणात संजय छाब्रिया यांची २५१ कोटींची तर, अविनाश भोसले यांची १६४ कोटींची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात ईडीनं एकूण १,८२७ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
Sambhaji Raje Bhosale: संभाजीराजे भोसले यांची परिवर्तन क्रांतीची हाक
माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी परिवर्तनाची हाक दिली आहे. क्रांती दिनी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात... भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला..." असं ट्वीट संभाजीराजे यांनी केलं आहे.
Amit Shah: नरेंद्र मोदी यांचं कौतुक करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान
जगात कुठलीही समस्या असो, जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत नाहीत, तोपर्यंत कुठलीही भूमिका ठरवली जात नाही. हा दिवस पाहण्यासाठीच लाखो लोकांनी प्राणांची आहुती दिलीय, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे.
Nancy Pelosi Taiwan Visit : विदेशात काळजी घ्या; राष्ट्राध्यक्ष बायडन अमेरिकेच्या नागरिकांना आवाहन
America China War Latest News : अमेरिकेच्या सिनेटर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर आता चीन आणि अमेरिकेतील संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विदेशात राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Mayawati Support BJP : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मायावतींचा भाजपला पाठिंबा
Mayawati Support Jagdeep Dhankhar : राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता देशात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कारण आता उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला आहे.
Sri Lanka: श्रीलंकेतील नव्या सरकारचं आज पहिलं संसद अधिवेशन
आणीबाणी व अराजकसदृश परिस्थिती निवळल्यानंतर श्रीलंकेचे नवे अध्यक्ष रानिल विक्रमासिंघे यांच्या सरकारचं पहिलं अधिवेशन आज सुरू होत आहे. या अधिवेशनात नेमकं काय होतं याबद्दल श्रीलंकन जनतेला उत्सुकता आहे.
CNG Price In Mumbai : सीएनजी आणि पीएनजीचे दर वाढले; इतक्या रुपयांनी झाली वाढ
CNG PNG Price Hike: देशात वाढत असलेल्या महागाईच्या मुद्द्यावरून काल संसदेत मोठा गदरोळ पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सीएनजीमध्ये सहा रुपये तर पीएनजीमध्ये चार रुपयांची वाढ झाली आहे.
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची घेणार भेट
LOP Ajit Pawar Meet CM Eknath Shinde And DCM Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा व विदर्भाच्या दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते अजित पवार हे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यात अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानामुळं शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
पंढरपूरमध्ये चौघांना मालगाडीने चिरडले, दोघांचा मृत्यू
पंढरपूरमध्ये रेल्वे स्टेशनवर चौघांना मालगाडीने चिरडलं आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. हे सर्वजण बिहारचे असल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच रेल्वे ट्रॅकवर बसून दारू पित असल्याचा संशय आहे. ट्रॅक शेजारी दारुच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
Mumbai Rain: जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पाऊस सुरू
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळी झालेल्या पावसामुळं किंग्ज सर्कलसह अनेक भागांत पाणी साचलं आहे.
Share Market: शेअर बाजार सकारात्मक, सेन्सेक्स किंचित वाढला
मंगळवारी सुरुवातीच्या सत्रात पडलेला बाजार दिवसअखेरी सावरला होता. आज तेच वातावरण दिसत असून सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला आहे. निफ्टी २५ अंकांनी वाढून १७,३७२ वर ट्रेंड करत आहे.
Uday Samant Attack: हिंगोली शिवसेना संपर्क प्रमुख पोलिसांच्या ताब्यात
उदय सामंत यांच्यावर हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी हिंगोलीचे शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना ताब्यात घेतलं आहे. १ ऑगस्टला बबन थोरात यांनी म्हटलं होतं की, जे जे जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छूक आहेत. त्यांना आव्हान आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रात ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावात येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्रीवर करण्यात येईल.
Maharashtra Politics : राज्यातील पेचावर आज सुप्रिम कोर्टात सुनावणी; न्यायालय काय देणार फैसला?
Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह इतर सर्व याचिकांची सुनावणी आज न्यायालय करणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. २७ जुलैपर्यंत दोन्ही बाजूंना आपापले मुद्दे खंडपीठासमोर मांडण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते, त्यानंतर न्यायालय या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याची आवश्यकता आहे की नाही, याचाही फैसला करणार आहे.
Aurangabad News : घाटी रुग्णालयात ३०० डॉक्टर संपावर; मारहाणीचं प्रकरण शिगेला
Maharashtra News : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयामध्ये मध्यरात्री अज्ञात रुग्णांच्या नातेवाईकांनी काही डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ घाटीतील तीनशेहून अधिक डॉक्टारांनी संप पुकारला आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवस रुग्णालयातील आरोग्यव्यवस्था कोलमडण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
Nancy Pelosi Taiwan : चीनने अमेरिकेवर लादले आर्थिक निर्बंध!
America China Conflict : अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटिव्हच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवानच्या दौऱ्याला चीननं विरोध केला होता. त्यानंतर चीनच्या दबावाला न झुगारचा पेलोसींनी तैवानचा दौरा केला . त्यानंतर आता चीननं अमेरिकेवर आर्थिक निर्बंध लादायला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
Uday Samant : उदय सामंत यांच्यावर हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखांना अटक
Uday Samant News Today Marathi : काल माजी मंत्री आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज भागात अनोळखी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात आता कोथरूड पोलिसांनी कारवाई करत शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरेंना अटक केली आहे.
Andhra Pradesh Gas Leak: आंध्र प्रदेशात गॅस गळती, ६८ जण रुग्णालयात दाखल
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं औद्योगिक क्षेत्रात गॅस लीकमुळे ६८ जण आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे. अनाकापल्ले जिल्ह्यातील अचुतापुरम इथल्या एका कंपनीत गॅस लीक झाल्याची माहिती मिळाली आहे. गॅस लीक झाल्यानंतर कामगारांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं, तसंच काहींना उलट्या झाल्या.