Marathi News 25 August 2022 Live : औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराचे ठराव विधानसभेत मंजूर
Aug 25, 2022, 06:48 PMIST
Marathi News Live Updates : राज्यासह देश विदेशातील ताज्या बातम्या आणि राजकीय घडामोडींचे लेटेस्ट अपडेट.
Nana Patole: शेतकरी आत्महत्यांप्रश्नी शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही - नाना पटोले
राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी विरोध पक्ष सातत्याने लावून धरत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी मदतसुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलेली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत परंतु शिंदे-फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चाही करत नाही, शेतकरी आत्महत्येविषयी हे सरकार गंभीर नाही, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याबद्दल सर्वपक्षीय नामकरण समितीच्या वतीनं सरकारचे आभार
नवी मुंबई आंंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा ठराव विधीमंडळात मंजूर केल्याबद्दल लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय नामकरण समितीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
Maharashtra Assembly Session: औरंगाबाद, उस्मानाबदच्या नामांतराचे ठराव विधानसभेत मंजूर
महाविकास आघाडी व त्यानंतर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळानं औरंगाबाद व उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्याबाबतचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.
Maharashtra Assembly Session: कुपोषणाच्या मुद्द्यावरून आदिवासी मंत्र्यांचा निषेध करत आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
कुपोषणाच्या मुद्यावर आदिवासी मंत्र्यांकडून आलेल्या असंवेदनशील उत्तराने आम्ही समाधानी नसल्याने आदिवासी मंत्र्यांचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याचे माजी मंत्री आणि गटनेते जयंत पाटील यांनी जाहीर केले आणि सर्व आमदारांनी सभात्याग केला.
Bilkis Bano : बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाची गुजरात सरकारला नोटीस!
Bilkis Bano Rape Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची सुटका करण्याचा निर्णय गुजरात सरकारनं घेतला होता. त्यानंतर बिल्किस बानोनं सुप्रीम कोर्टात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली, त्यावर सुनावणी करताना कोर्टानं गुजरात सरकारला मोठा झटका दिला आहे, कारण आता आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयावरून कोर्टानं गुजरात सरकारकडं उत्तर मागितलं आहे.
लवासाचे खोके, बारामती ओके; सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीला आता सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजीने उत्तर दिलं आहे. खड्ड्यांचे खोके, मातोश्री ओक्के, लवासाचे खोके, बारामती ओक्के अशा घोषणा भाजप आणि शिंदे गटातील आमदारांनी दिल्या.
Raj Thackeray In Pune: मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर; आज होणार सभासद नोंदणीला सुरुवात
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत. ते मनसेच्या शहर कार्यालयास भेट देणार असून त्यांच्या हस्ते सभासद नोंदणी मोहिमेला सुरुवात होणार आहे.
Monsoon Session: शिंदे गटाची बॅनरबाजी, व्यंगचित्रातून आदित्य ठाकरेंवर निशाणा
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बॅनरबाजी करत घोषणा दिल्या. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र काढलेलं बॅनर आमदारांनी हातात घेतलं होतं.
Share Market: शेअर बाजार सकारात्मक; सेन्सेक्समध्ये ३०० अंकांची वाढ
मागील काही दिवस किंचिंत घसरलेला शेअर बाजार आज सकारात्मक दिसत आहे. सेन्सेक्स जवळपास ३०० अंकांनी वधारला असून निफ्टी ८६ अंकांनी वाढून १७६९० वर ट्रेड करत आहे.
Coronavirus: मागील २४ तासांत देशात १० हजार ७२५ नव्या करोना रुग्णांची नोंद
गेल्या २४ तासांत देशभरात १०,७२५ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे तर, १३,०८४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ९४,०४७ जणांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.
Bus Accident : रत्नागिरीत दोन एसटी बसची धडक, २५ जण जखमी
रत्नागिरीतील दापोलीत दोन एसटी बसचा अपघात झाला आहे. यामध्ये २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक बस चालक गंभीर जखमी असून सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Tumakuru Accident : कर्नाटकातल्या तुमकुरूमध्ये जीप आणि ट्रकचा भीषण अपघात; नऊ कामगार ठार!
Road Accident In Tumakuru Karnataka : कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातल्या सिरा-तुमकुरू राष्ट्रीय महामार्गावर जीप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून त्यात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश असून ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. कामगारांना बंगळूरूकडे घेऊन जात असलेल्या जीपला हा अपघात झाल्यानं त्यातून प्रवास करणाऱ्या नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
Aarey Metro Cae Shed : मेट्रो कारशेडसाठी आरेत एक झाड जरी तोडलं तर कारवाई करा; सुप्रीम कोर्टाचा इशारा
Supreme Court on Aarey Metro Cae Shed : आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी नव्यानं वृक्षतोड करू नका, एक झाड जरी तोडण्यात आल्याचं लक्षात आल्यास कारवाई करू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं मुंबई मेट्रोल रेल्वे महामंडळ लिमिटेड म्हणजेच MMRCL ला दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरेत मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणवाद्यांनी आंदोलन सुरू केलं होतं, त्यानंतर आता कोर्टानं वृक्षतोड केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
Bapusaheb Gorthekar : राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं निधन!
Bapusaheb Gorthekar Passed Away : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं आहे. त्यांच्यावर नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचं आज गोरठा या गावात अंत्यसंस्कार होणार आहे.
Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी!
Bilkis Bano Case : बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींची गुजरात सरकारनं सुटका केली होती. त्याविरोधात आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून सुप्रीम कोर्ट त्यावर आज सुनावणी घेणार आहे. त्यामुळं या प्रकरणात कोर्ट काय निर्णय घेणार याकडं देशाचं लक्ष लागलेलं आहे.
SC On Maha Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुनावणी पुन्हा लांबणीवर? आजही कामकाजात प्रकरण नाही
राज्यातील सत्ता संघर्षाच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याचा निर्णय दिला. त्यानंतर पुढील सुनावणी आज होईल असं खंडपीठाने सांगितलं होतं. यामध्ये पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये असंही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, आज सुनावणी होणार असं न्यायालयाने सांगितलं होतं पण आजच्या कामकाजात या प्रकरणाचा समावेश नसल्याची माहिती समोर येत आहे.
Monsoon Session: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये झालेल्या राड्यानंतर वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज सभागृहात काय होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.