Live Blog: महाराष्ट्राच्या जनतेपुढे सत्तेचा माज चालत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
Jun 19, 2022, 01:57 PMIST
Daily News Update
महाराष्ट्राच्या जनतेपुढे सत्तेचा माज चालत नाही - मुख्यमंत्री ठाकरे
देशात तुम्ही काहीही केलं तरी महाराष्ट्र वेगळा विचार करतो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही पण महाराष्ट्राच्या जनतेपुढे सत्तेचा माज चालत नाही. प्रत्येकाला पर्याय असतो आणि शेराला सव्वाशेर हा असतोच. जो शेर असतो त्याने लक्षात ठेवावं उद्या कोणीतरी सव्वाशेर येईल. आताचं राजकारण हे पावशेरचं सुरुय. महाराष्ट्र जेव्हा पेटतो तेव्हा ज्याच्यासाठी पेटतो त्याला जळून खाक केल्याशिवाय राहत नाही.
तुघलकानेसुद्धा कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती केली नसती - राऊत
देशात वेडा तुघलक होता, त्यानेही कंत्राटी पद्धतीने सैन्य भरतीचा निर्णय घेतला नसता. ठेकेदारी पद्धतीने गुलाम नेमले जातात देशाचे सैन्य नाही. मोदी सरकारच्या निर्णयामुळे अराजक निर्माण झालंय. महाराष्ट्र शांत आहे, पण खदखद आहे. महाराष्ट्र शांत आहे कारण राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे आहे.
शिवसेनेला हिंदुत्व इतरांकडून शिकायची गरज नाही - राऊत
शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं हिंदुत्व काय, कोणाचं आणि कसं चाललंय हे कुणाकडून शिकायची आम्हाला गरज नाही असं म्हणत विरोधकांना सुनावलं. शिवसेनेच्या स्थापनेला ५६ वर्षे झाली आहेत. अब तक छप्पन, अजून पुढे बरंच आहे हे राजकीय विरोधकांनी समजून घ्यावं असा इशाराही त्यांनी दिला.
सिकंदराबाद हिंसाचार प्रकरणी माजी सैनिकाला अटक
सिकंदराबाद हिंसाचार प्रकरणी एका माजी सैनिकाला अटक करम्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सिकंदराबादमध्ये उसळलेल्या हिंसाचाराचा सूत्रधार अवुला सुब्बा राव असल्याचं सांगितलं जात आहे. सिकंदराबादमध्ये रेल्वे गाड्यांना आग लावण्यात आली होती. यावेळी झालेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
देशात गेल्या २४ तासात १२८९९ नव्या रुग्णांची नोंद
देशात गेल्या २४ तासात १२ हजार ८९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १५ जणांचा मृत्यू झाला. सध्या देशात ७२ हजार ४७४ सक्रीय रुग्ण आहेत. आदल्या दिवशीच्या तुलनेत आज नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
राजनाथ सिंह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
देशभरात अग्निपथ योजनेला विरोध सुरू असून केंद्र सरकार आता यावर पावले उचलत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी समीक्षा बैठक बोलावली आहे.
अग्निपथ विरोधात काँग्रेसची ‘सत्याग्रह’ करण्याची तयारी
लष्करातील भरतीसाठी अग्निपथ योजनेला विरोध केला जात असून आता याला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून दिल्लीत जंतर-मंतरवर सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत पहाटे पावसाला सुरुवात, २-३ दिवसात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईत आज पहाटे सुरुवात झाली आहे. आजपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
कोट्यवधी तरुणांचे मन दु:खी, माझा बर्थडे साजरा करू नका : राहुल गांधी
देशातील परिस्थितीमुळे आम्ही सर्वजण काळजीत आहोत. कोट्यवधी तरुणांचे मन दु:खी आहे. आपण या तरुणांच्या, कोट्यवधी कुटुंबांच्या वेदना समजून घ्याव्यात, त्यांच्यासोबत उभा रहावं. मी देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि माझ्या हितचिंतकांना आवाहन करतो की माझ्या वाढदिवसाला कोणत्याही प्रकारचा उस्तव साजरा करू नये.
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ५ बिल्डर्सना मुंबई पोलिसांनी केली अटक
फ्लॅट बूक केलेल्या लोकांना ते ताब्यात न दिल्यानं फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच बिल्डर्सना अटक केली आहे. वेगवेगळ्या फसणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.