हे मात्र अतिच झालं! यशस्वी जैस्वालला ५३ चेंडूंमध्ये एकही रन काढता आला नाही
संघातील सहकारी खेळाडूंनीही यशस्वीची मजा घेतली. त्यांनी मजेशीर पद्धतीने टाळ्या वाजवल्या.
मुंबईचा (mumbai ranji team) युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (yashasvi jaiswal) सध्या रणजी ट्रॉफीमध्ये (ranji trophy) आपल्या फलंदाजीचे शानदार प्रदर्शन करत आहे. मुंबईकडून खेळताना त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात उत्तर प्रदेशविरुद्ध शतक झळकावले. मात्र, या शतकासाठी यशस्वीला खेळपट्टीवर खूप संघर्ष करावा लागला.
ट्रेंडिंग न्यूज
यशस्वीने पहिल्या डावात २२७ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात यशस्वीला खाते उघडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. दुसऱ्या डावात यशस्वीला ५३ चेंडूपर्यंत एकही धाव काढता आली नाही.
दुसऱ्या बाजूने कर्णधार पृथ्वी शॉने आक्रमक फलंदाजी करत ६६ धावांची सलामी दिली. यात शॉच्या ६४ धावा होत्या. अखेर ७१ चेंडूत ६४ धावा करुन पृथ्वी शॉ बाद झाला. तरी देखील यशस्वी जैस्वालला आपले खाते उघडता आले नव्हते.
यानंतर यशस्वीने ५४ व्या चेंडूवर चौकार मारून आपले खाते उघडले. त्याने चौकार मारताच शतक पूर्ण केल्यासारखे मजेदार पद्धतीने बॅट उंचावून सेलिब्रेशन केले. यशस्वीच्या या सेलिब्रेशनमध्ये सहकारी खेळाडूही सामील झाले.
संघातील सहकारी खेळाडूंनीही यशस्वीची मजा घेतली. त्यांनी मजेशीर पद्धतीने टाळ्या वाजवल्या. काहींनी तर उभे राहूनही टाळ्या वाजवल्या. यशस्वीही मैदानातून सर्वांना बॅट दाखवताना दिसला. मात्र, पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या यशस्वीने सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ११४ चेंडूत ३५ धावा केल्या आहेत. म्हणजेच ५३ चेंडूपर्यंत खातेही उघडू न शकलेल्या यशस्वीने पुढच्या ६१ चेंडूत ३५ धावा केल्या.
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३९३ धावा केल्या होत्या. यात यशस्वीच्या शतकाचा मोठा वाटा होता. त्याच्याशिवाय हार्दिक तोमरनेही ११५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात १८० धावाच करू शकला. यानंतर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने १ गडी गमावून १३३ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे मुंबई संघाला ३४६ धावांची आघाडी मिळाली आहे.