T20 World Cup: पाकिस्तान आज जिंकल्यास भारताची होणार अडचण; सेमीफायनलबाबत हर्षा भोगलेंचा इशारा
T20 World Cup: सेमीफायनलचे सामने सुरू होण्यासाठी आता सुपर १२ फेरीतले फक्त ७ सामने उरले आहेत. मात्र अद्याप ग्रुप १ आणि ग्रुप २ मधील कोणत्याही संघाने सेमीफायनलमध्ये जागा पक्की केलेली नाही.
T20 World Cup: ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी २० वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी संघांमध्ये शर्यत लागली आहे. सेमीफायनलचे सामने सुरू होण्यासाठी आता सुपर १२ फेरीतले फक्त ७ सामने उरले आहेत. मात्र अद्याप ग्रुप १ आणि ग्रुप २ मधील कोणत्याही संघाने सेमीफायनलमध्ये जागा पक्की केलेली नाही. सामन्यागणिक सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं गणित बदलत आहे.
बुधवारी भारताने बांगलादेशला पराभूत करत सेमीफायनलच्या दिशेनं एक पाऊल टाकलं. मात्र आज पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाणारा सामना भारताच्या अडचणी वाढवू शकतो. यावरून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी पाकिस्तानच्या विजयामुळे भारताला फटका बसेल यावरून इशारा दिला आहे.
हर्षा भोगले यांनी ट्विटरवर म्हटलं की, आज सांयकाळी मोठा सामना होणार आहे. जर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवलं आणि पुन्हा बांगलादेशसोबतही जिंकले तर भारताला कोणत्याही परिस्थिती झिम्बॉब्वेला पराभूत करावं लागेल. कारण धावगतीच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा मागे राहील.
भारताने चार सामन्यात सहा गुणांसह ग्रुप २ मध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. तर बांगलादेश तिसऱ्या स्थानी आहे. भारताचे चार सामन्यात सहा गुण झाले आहेत आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी रविवारी अखेरच्या सामन्यात झिम्बॉब्वेला पराभूत करावं लागेल.
पाकिस्तानचे अखेरचे दोन सामने हे दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरोधात आहेत. त्या दोन्हीमध्ये विजय मिळवला आणि भारताचा जर अखेरच्या सामन्यात झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव झाला तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे धावगतीच्या बाबतीत सध्या पाकिस्तान भारताच्या थोडा पुढे आहे. भारताची धावगती ०.७३० आहे तर पाकिस्तानची ०.७६५ इतकी आहे.
संबंधित बातम्या